Saturday, May 30, 2026

" तो फक्त हसत राहिला...आणि आतून तुटत गेला..."

दि.३०/०५/२०२६...

आजकालच्या जगात माणसं खूप जोडली गेली आहेत…

फोनमध्ये contacts वाढले,

social media वर followers वाढले,

गप्पा वाढल्या,

status वाढले…

पण मनाने जोडलेली माणसं मात्र कमी होत गेली…

कारण आता नात्यांमध्ये प्रेमापेक्षा “सोय” जास्त दिसते…

आणि त्या सोयीसाठी प्रत्येकाला त्यांच्या आयुष्यात

एक असा माणूस हवा असतो…

जो कायम त्यांच्या मनासारखा वागेल…

एक “जोकऱ”…

जो स्वतःच्या भावना बाजूला ठेवून

समोरच्याला हसवत राहील…

समोरच्याचं दुःख समजून घेईल…

त्याच्या प्रत्येक mood ला सांभाळेल…

त्याच्या चुका माफ करेल…

त्याच्या रागालाही प्रेम समजेल…

पण स्वतःचं मन?

स्वतःच्या वेदना?

स्वतःच्या अपेक्षा?

त्यासाठी कुणाकडेच वेळ नसतो…

लोकांना असा माणूस हवा असतो

जो त्यांच्यासाठी २४ तास available असेल…

त्यांनी message केला की लगेच reply देईल…

फोन केला की सगळं बाजूला ठेवून बोलेल…

त्यांच्या प्रत्येक अडचणीत धावत येईल…

पण जेव्हा त्यालाच कोणाची गरज असते,

तेव्हा मात्र त्याच्यासाठी

“मी busy होतो…”

“नंतर बोलू…”

“तू खूप emotional होतोस…”

इतकंच उरतं…

हळूहळू तो माणूस समजून जातो

की त्याची किंमत

त्याच्या मनासाठी नाही…

तर तो किती सहन करू शकतो यासाठी आहे…

तो किती वेळा स्वतःला दुखावूनही

समोरच्याला हसवू शकतो…

तो किती वेळा ignore होऊनही

पुन्हा तसाच प्रेमाने बोलू शकतो…

तो किती वेळा तुटूनही

“मी ठीक आहे…”

हे खोटं हसून सांगू शकतो…

काही लोकांच्या आयुष्यात

असे लोक कायम असतात…

जे स्वतःपेक्षा दुसऱ्यांना जास्त जपतात…

दुसऱ्यांच्या आनंदासाठी स्वतःच्या इच्छा मारतात…

दुसऱ्यांच्या एका smile साठी

रात्रभर जागतात…

पण त्यांचं दुःख?

त्यांच्या डोळ्यातली झोप?

त्यांच्या मनातला थकवा?

तो कुणाला दिसत नाही…

कारण जगाला नेहमी

आनंदी चेहरा हवा असतो…

मनातल्या जखमा नाही…

आणि गंमत म्हणजे,

सगळ्यांना हसवणारा माणूसच

रात्री उशीमध्ये चेहरा लपवून

सर्वात जास्त रडत असतो…

तो कुणाकडे तक्रार करत नाही…

कारण त्याला माहीत असतं,

लोकांना त्याच्या भावना समजून घ्यायच्या नाहीत…

त्यांना फक्त तो

त्यांच्या मनासारखा हवा असतो…

नातं टिकवण्यासाठी

नेहमी एकाच व्यक्तीने adjust करत राहणं,

स्वतःला बदलत राहणं,

स्वतःच्या भावना दाबत राहणं…

हे प्रेम नसतं…

ती हळूहळू स्वतःला हरवण्याची प्रक्रिया असते…

आणि एक दिवस

तो “जोकऱ” शांत होतो…

बोलणं कमी करतो…

अपेक्षा ठेवणं बंद करतो…

कारण त्याला समजतं —

लोकांना खरं तर

भावना असलेला माणूस नको असतो…

त्यांना असा कुणीतरी हवा असतो

जो त्यांच्या आयुष्यात

फक्त हसवत राहील,

सांभाळत राहील,

समजून घेत राहील…

पण स्वतःचं मन मात्र

कधीच व्यक्त करणार नाही…

आणि म्हणूनच…

कधी कधी

सगळ्यांच्या चेहऱ्यावर हास्य आणणारा

“जोकऱ”च

आतून एकटाच राहतो…!

© 2026 | लेखनाधिकार : आशुतोष दंडगव्हाळ

विचार मांडणी ही वैयक्तिक असून अनधिकृत वापरास मनाई आहे.

Friday, May 15, 2026

" तुझसे नाराज नहीं,जिंदगी हैरान हुं मैं"....

 


दि.१५/०५/२०२६..

तुझसे नाराज़ नहीं ज़िंदगी… हैरान हूँ मैं” — आयुष्याच्या वेदनांना स्पर्श करणारे गाणे...

मासूम चित्रपटातील हे गाणे आठवते का?.... ह्यात आयुष्यावर राग नाही, पण आयुष्यातील गुंतागुंत, एकटेपणा आणि नात्यांमधील वेदना यामुळे मन गोंधळलेले आहे. माणूस परिस्थितीशी लढतोय, प्रश्न विचारतोय, पण तरीही आयुष्याशी नातं तोडत नाहीये, ते चांगले कसे जगता येईल हे बघतोय,तसा प्रयत्न करतोय,ती गुंतागुंत सोडवता येतीये का ते बघतोय..

या गाण्याची खरी ताकद म्हणजे त्यातला साधेपणा. कोणताही आक्रोश नाही, कोणतीही तक्रार नाही. फक्त शांतपणे आयुष्याला विचारलेला एक प्रश्न — “तू असा का आहेस?” आणि कदाचित म्हणूनच हे गीत प्रत्येकाच्या मनाला स्पर्शून जातं.

काही गाणी ही फक्त ऐकण्यासाठी नसतात, ती जगण्यासाठीच असतात. ती आपल्या आयुष्याचा एक भाग बनतात. त्यातलेच हे एक गाणे, आजही ऐकले की अगदी भरून येते. माणूस कितीही मजबूत असला, तरी त्याच्या मनाच्या एका कोपऱ्यात काही न बोललेली दुःखं, काही अपूर्ण स्वप्नं, काही हरवलेली माणसं आणि काही न भरून येणाऱ्या जखमा कायम जिवंत असतात. आणि त्या तो कोपरा सोडून बाहेर आल्या की,अशा प्रत्येक क्षणी नकळत मनात उमटणारं गाणं म्हणजे " तुझसे नाराज नाही जिंदगी..." हो की नाही, असा कोणी सापडणार नाही,ज्याला ही गाणे आवडणार नाही किंवा ऐकल्यावर गलबलून येणार नाही, खरं सांगायचे हा अगदी..

हे गीत ऐकताना असं वाटतं, जणू एखादा माणूस स्वतःच्या आयुष्याशी शांतपणे संवाद साधतोय. कोणताही गोंधळ नाही, कोणतीही मोठी तक्रार नाही, कोणताही आक्रोश नाही. फक्त एक खोल वेदना आहे… आणि त्या वेदनेतून जन्मलेला एक साधा प्रश्न —

“मी तुझ्यावर रागावलेलो नाही रे आयुष्या… पण तू असा का आहेस,असा का वागतोस,इतकी कोणी परीक्षा घेतो का ते कोणी, हे मला समजत नाही.”

माणूस जेव्हा लहान असतो, तेव्हा त्याला आयुष्य म्हणजे आनंद, स्वप्नं, यश आणि प्रेम असं वाटतं. त्या वयात जग खूप सुंदर दिसतं. प्रत्येक नातं कायमचं वाटतं, प्रत्येक स्वप्न पूर्ण होईल असं वाटतं. पण जसजसं वय वाढत जातं, तसं तसं आयुष्याचे खरे रंग दिसायला लागतात. काही लोक अचानक बदलतात, काही नाती नकळत तुटून जातात, काही स्वप्नं परिस्थितीच्या ओझ्याखाली गाडली जातात. आणि सर्वात जास्त वेदना तेव्हा होतात, जेव्हा आपण मनापासून जपलेल्या गोष्टी आपल्या हातातून हळूहळू निसटत जातात,स्वप्न तुटतात, हरवतात.

पण खरे सांगायचे तर आयुष्याची सर्वात मोठी शोकांतिका म्हणजे ते कधीच आपल्या मनासारखं चालत नाही. आपण खूप काही ठरवतो, योजना आखतो, मनात भविष्याची सुंदर चित्रं रंगवतो; पण आयुष्य अचानक वेगळंच वळण घेतं. काही क्षण असे येतात, जिथे माणूस पूर्णपणे तुटून जातो. बाहेरून तो हसत असतो, लोकांमध्ये वावरत असतो, जबाबदाऱ्या पार पाडत असतो; पण आतून मात्र तो शांतपणे कोसळत असतो.

कधी कधी दुःख इतकं खोल असतं की डोळ्यांत अश्रूही येत नाहीत. कारण काही वेदना रडून कमी होत नाहीत; त्या फक्त मनाच्या तळाशी जाऊन कायमच्या राहतात. हे गाणं त्या वेदनांना शब्द देतं. म्हणूनच ते ऐकताना प्रत्येकाला वाटतं — “हे गाणं माझ्यासाठीच लिहिलं गेलं आहे,माझेच गाणे आहे,म्हणून ते मनापासून आवडतं,कानाजवळ राहतं.”

आपल्या आयुष्यात काही माणसं अशीच असतात, ज्यांच्यावर आपण जीवापाड प्रेम करतो. त्यांच्यासाठी स्वतःचं सुख विसरतो, स्वतःला बदलतो, स्वतःच्या इच्छा मारतो. पण अनेकदा तीच माणसं आपल्याला सर्वात जास्त वेदना देऊन जातात. तेव्हा प्रश्न पडतो — चूक नेमकी कुणाची होती? आपल्या प्रेमाची? आपल्या अपेक्षांची? की नशिबाची? पण उत्तर कधीच मिळत नाही. फक्त मनात एक पोकळी तयार होते.

हे गाणं त्या पोकळीची जाणीव करून देतं. ते सांगतं की आयुष्य नेहमीच न्याय देत नाही,कधीकधी चांगल्या माणसांनाही दुःख मिळतं, प्रामाणिक माणसांनाही एकटेपणा मिळतो, आणि मनापासून प्रेम करणाऱ्यांनाही विरह मिळतो. तरीही माणूस जगत राहतो. कारण जगणं हा त्याचा स्वभाव असतो.

या गाण्यातील सर्वात सुंदर गोष्ट म्हणजे त्यातील स्वीकार. यात कुठेही आयुष्यावर आरोप नाहीत. फक्त एक हळवी कबुली आहे —

“मी दुखावलो गेलो आहे… पण तरीही जगण्यावरच माझं प्रेम संपलेलं नाही,आशा संपलेल्या नाहीत, अपेक्षा अजूनही आहेत,तू जे माझ्यासाठी लिहितोयेस ते मी स्वीकारलय.”

काही वेळा आयुष्य आपल्याकडून खूप काही हिरावून घेतं. जवळची माणसं दूर जातात, परिस्थिती बदलते, शरीर थकायला लागतं, मनाला आधार उरत नाही. अशा वेळी माणूस स्वतःलाच विचारतो — “मी इतका प्रयत्न करूनही रिकामाच,एकटाच का राहिलो?” पण त्यावर आयुष्याचं उत्तर असतं — प्रत्येक गोष्ट मिळण्यासाठी नसते राजा; काही गोष्टी फक्त अनुभवण्यासाठी असतात.

हे गीत आपल्याला शिकवतं की वेदना टाळता येत नाहीत, पण त्या समजून घेता येतात. प्रत्येक तुटलेलं स्वप्न आपल्याला काहीतरी शिकवून जातं. प्रत्येक अपयश आपल्याला अधिक मजबूत बनवतं. प्रत्येक हरवलेलं नातं आपल्याला माणसांची खरी किंमत समजावून देतं.

आजच्या जगात प्रत्येक जण आतून कुठेतरी थकलेला आहे. कोणी पैशासाठी झगडतो आहे, कोणी नात्यांसाठी, कोणी स्वतःच्या अस्तित्वासाठी. लोक चेहऱ्यावर हसू ठेवतात, पण मनात मात्र हजारो वादळं चालू असतात. म्हणूनच हे गाणं आजही तितकंच जिवंत वाटते, आपलसं वाटते. कारण काळ बदलला, माणसं बदलली, परिस्थिती बदलली… पण माणसाच्या मनातील वेदना मात्र तशाच राहिल्या,त्या बदलल्या नाहीत, काळ जशा होत्या,आजही तश्याच आणि त्याच आहेत.

शेवटी आयुष्य हे कधीच पूर्णपणे समजत नाही. ते कधी आनंद देतं, कधी दुःख देतं, कधी अचानक रडवतं, तर कधी नकळत हसवतं. पण या सगळ्यात एक गोष्ट कायम राहते — माणसाची जगण्याची इच्छा,आशा,अपेक्षा..हो की नाही?

आणि म्हणूनच हे गाणं ऐकताना मन नकळत शांत होतं. कारण ते आपल्याला सांगतं कि तू काही एकटा नाहीस.तुझ्यासारखे हजारो लोक आहेत, जे ह्याच परिस्थितीतून जातायेत,ती सगळी माणसे आयुष्यावर रागावलेले नाहीत… तर आश्चर्यचकित आहेत, थोडेसे हरवलेले आहेत…थोडेसे थकलेले आहेत…आणि शांतपणे आयुष्याला म्हणतायेत -“तुझसे नाराज़ नहीं ज़िंदगी…हैरान हूँ मैं…”

हे अमर गाणे गुलजारसाहेब ह्यांनी लिहिलंय, त्यांच्या लेखनाची खासियत म्हणजे "साध्या शब्दांत अतिशय खोल भावना व्यक्त करणं." म्हणूनच हे गाणं आजही प्रत्येकाच्या मनाला भिडतं.

ही गाणे ऐकून तुम्हाला काय वाटते ते नक्की सांगा...

© 2026 | लेखनाधिकार : आशुतोष दंडगव्हाळ

विचार मांडणी ही वैयक्तिक असून अनधिकृत वापरास मनाई आहे.

Sunday, May 3, 2026

" मेरा नाम जोकर - राजु."

दि. ३०.०४.२०
" मेरा नाम जोकर " - राजु.
राज कपूर चा एक गाजलेला चित्रपट, आपल्याकडे चालला नाही,का नाही चालला ते एक कोडेच आहे. चित्रपट मोठा होता, पण कंटाळवाणा होता असे वाटत नाही, काही दृश्य त्यावेळेस च्या परिस्थिती नुसार धाडसी होती,पण तो चित्रपट न चालण्याचे एकमेव कारण असू शकेल असे वाटत नाही, कारणे काहीही असो राज कपूर सारख्या माणसाचा तो चित्रपट भारतात जादू दाखऊ शकला नाही, पण रशियात तो लोकांनी डोक्यावर घेतला,आजही भारत म्हटले की रशियन मेरा नाम जोकर आणि राज कपूर ची आठवण काढतात. माझे म्हणाल तर,मला हा चित्रपट खरंच खूप आवडला,त्याला खूप कारणं आहेत. म्हणून त्यावर लिहावं असे वाटले म्हणून ही येवढी प्रस्तावना... जरा मोठीच झालिये,पण त्याशिवाय पुढे जावेसेच वाटेना...
थोडक्यात ह्या चित्रपटाची कथा अशी,ह्यातले प्रमुख पात्र " राजु ". हा मुलगा गरीब घरातला, वडील सर्कस मध्ये, स्टंट करताना वारलेले, त्यामुळे आईला सर्कस,त्यातल्या नोकरीची कमालीची चीड आणि भीती, म्हणून ही आई काबाड कष्ट करून राजुला वाढवत असते,त्याला शपथ घालते की कधीही सर्कस किवा तिथली नोकरी नको.तिचे स्वप्न,मुलानी खूप शिकून मोठे व्हावे,चांगली नोकरी करावी,छान संसार करावा. साधे, सुटसुटीत, कोण्याही आईने आपल्या मुलांसाठी पहावे असे स्वप्न, आणि त्यात गैर ते काय असावे,आपण सगळेच अशीच स्वप्ने पाहत असतो स्वतःसाठी, मुलांसाठी,आणि ज्यांना हे सगळे जमते ते आदर्श वाटतात लोकांना, त्यांची उदाहरणे लोक देतात. तर असेच स्वप्न राजूची आई राजु साठी बघत असते,तर तिथे ह्या पठ्ठ्याचे स्वप्न काय तर ह्याला "जोकर" व्हायचे असते,लोकांना हसवायचे , त्यांची करमणूक करायची,आणि तो तसा प्रयत्नही करत असतो,शाळेत काय किवा बाहेर काय तो  सगळ्यांना हसवायचा प्रयत्न करत असतो. लोक त्याच्या गबाळेपणाला, धांद्रटपणाला,गरिबीला,त्याच्या कपड्यांना हसत असतात त्याची मजा उडवतात,त्याचा उपयोग करून घेतात,आणि काम झाले की हाकलून देतात. ते त्यांचे असे हसणे, वापरून घेणे हा मुलगा मजेत घेत असतो,त्याला त्याचे काहीही वाटत नाही,कारण त्याचे ध्येयच ते असते कि काहीही करून सगळ्यांना हसवायचे, एक उत्कृष्ट जोकर व्हायचे, ह्या बदल्यात त्याची कुठलीच अपेक्षा नाहीये,फक्त येवढेच की लोकांनी त्याला एक चांगला जोकर म्हणून ओळखावे...हा राजु शेवटपर्यंत हाच प्रयत्न करत असतो मध्ये मध्ये त्याच्या आयुष्यात सुखाचे क्षणही येतात,पण कोणी न कोणी ते काही काही कारणे देत त्याचेपासुन हिरावून घेतात,एक आई असते तीपण सोडून जाते, चित्रपट पाहताना सारखे वाटत राहाते की जगात लोक दुसऱ्यांचा पायरी म्हणून इतका कसा उपयोग करून घेत असतील, समोरच्याला भावनाच नाहीत का, असे त्याचेशी वागु कसे शकतात, की त्या माणसाचे दुर्दैव,चूकी की त्यानी लोकांच्या हसण्यात स्वतःचे सुख शोधले,इतके प्रश्न निर्माण होतात आणि मग मन खूप उदास होते....
खरे सांगा, असा एखादा राजु तुमच्या आजू - बाजूला तुम्हाला दिसला असेलच, किवां कधी तरी तुमचाच राजु झाला असेल,तुम्ही पण असेच सगळ्यांची मनं सांभाळत आला असाल पण तुमक्या मनाचा कधीच कोणी विचारही केला नसेल,तुम्हाला काय आवडतं,काय नाही आवडत ह्याचा जरा सुद्धा विचार केला नसेल,फक्त आणि फक्त तुम्हाला वापरत आले असतील,आणि काम झाल्यावर खड्यासारखे तुम्हाला बाजूला केले असेल, ही अशी परिस्थिती कधी कधी प्रत्येकाच्याच वाट्याला आली असेल,अनुभवली असेल,त्यावेळेस तुम्हाला कसे वाटले असेल? आपण कधीतरी ह्या अश्या परस्थिती तून गेलो तरी सगळ्यांचा राग येतो,तिथे आपण लगेच बदलतो चांगुलपणा कमी करतो.
पण काहिंचे नशीब ह्या राजु सारखे असते, ते आयुष्यभर दुसऱ्याला आनंदी ठेवायचा प्रयत्न करतात,त्यासाठी स्वतःचे आयुष्य,पैसा,भावना,स्वाभिमान सगळे सगळे देतात,समोरचा त्यांना फक्त ओरबाडत असतो,ते सगळे कळूनही हे सतत देत राहतात. स्वतः त्यांना ह्या बदल्यात कधीच काहीच मिळत नाही,साधे दोन प्रेमाचे शब्द सुद्धा ह्या माणसाच्या नशिबी नसतात,इतके दुर्दैवी कोणी असू शकते का, देवानी काहीच लिहिले नसेल का ह्यांच्या नशिबी? त्यांचे कपाळ असे कोरे ठेऊन का बरे पाठवले असेल देवाने त्यांना? स्वतःचा स्वाभिमान गहाण ठेऊन दुसऱ्यांना हसवणे,दुसऱ्यांसाठी आनंद शोधणे, समोरच्याला देत राहाणे खरच खुप अवघड असते.. आजकालच्या जगात अशी वृत्ती सांभाळणे धोकादायक आहे,कारण इथे सगळे स्वतःसाठी जगणारे आहेत,पण त्यातही ( ही राजु सारखी माणसे) आशेचा किरण आहेतच की,म्हणून तर जग चालू आहे...
असे कितीतरी राजु ( दुसऱ्यांचा सुखात स्वतः विरघळून जाणारे) आज आपल्या आजूबाजूला आहेत म्हणून आपण जगतोय,  कधी आपण स्वतःच ( थोड्या वेळा करिता का होईना) राजु बनतोय म्हणून हे सगळे चालू आहे, नाहीतर आपण कधीच संपलेलो असतो.राजु एक वृत्ती आहे ती थोडेफार का होईना प्रत्येक माणसाने घ्यायलाच हवी, चला तर मग दोस्तहो आज पण करूया ह्या राजुला ( ह्या वृत्तीला) तुमच्या आमच्यात जपण्याचा.......
आशुतोष दंडगव्हाळ...

Tuesday, April 14, 2026

हक्काचं घर आणि हक्काची माणसं…


दि. १४.०४.२०२६..

कधी कधी आपण ज्या घराला “आपलं” समजतो,
तेच घर एक दिवस पूर्णपणे परकं वाटायला लागतं…
आणि ज्या माणसांना “हक्काचं” मानतो,
त्यांच्या आयुष्यात आपल्यासाठी जागाच नसते…

जुनी लोकं नेहमी सांगायचे छोटेसे का होऊन हक्काचे घर हवे, तसे ते आपण करतोही,आजही कितीही काही कोणी म्हटले 
तरी प्रत्येकाचे स्वतःच्या घराचे स्वप्न हे असतेच आणि ते तो पूर्ण करायची जीवतोड प्रयत्न करतो, पण हे तर झाले आपले 
घराविषयी, पण मला सांगायचे ते दुसरे हक्काचे घर, जिथे आपण आपल्या ह्या हक्काच्या घरासारखेच feel करतो, कुठलाही 
आडपडदा, सोपस्कार तिथे नसतात,तोच जिव्हाळा,प्रेम आणि सगळे काही अगदी आपल्या घरासारखेच.
आपण सगळेच आयुष्यात दोन गोष्टींच्या शोधात असतो,एक असे हे  हक्काचं घर आणि दुसरी हक्काची माणसं.
आपण मनापासून विश्वास ठेवतो की,“हे ही घर माझंच आहे… इथे मला समजून घेतलं जाईल.”
आणि,“ही माणसं माझी आहेत… ही कधीच मला सोडून जाणार नाहीत.”पण आयुष्य प्रत्येक वेळी आपल्याला हवं तसं उत्तर 
देत नाही…ज्या घराला आपण “आपलं” समजत होतो,जिथे आपण आपलेपण शोधत होतो,
तेच घर एक दिवस इतकं परकं वाटायला लागतं…तिथे आपल्यासाठी जागा असते,पण आपुलकी नसते.आपण तिथे राहतो,पण कोणी आपल्या अस्तित्वाची दखलही घेत नाही,समजून घेत नाही.आपल्या भावना, आपल्या वेदना,सगळं काही त्या चार भिंतींमध्येच अडकून राहतं.तेव्हा कळतं, हे घर “हक्काचं” नव्हतंच कधी, ती फक्त एक राहण्याची जागा होती.
असेच काहीसे हक्काच्या माणसांबद्दल,हक्काची माणसं… की फक्त एक भास?
आपण काही माणसांना इतकं जवळचं मानतो,की त्यांच्याशिवाय आयुष्याची कल्पनाच करवत नाही. 
आपल्याला वाटतं —“हा माणूस माझ्यासाठी आहे.”“काहीही झालं तरी, हा मला कधीच सोडून जाणार नाही.” आपण जसे 
आहोत तसे ते आपल्याला स्वीकारतील. आपण दुसरीकडे खूप matured वागतो, पण ह्या माणसां पुढे हट्ट करतो , इथे मॅच्युरिटी दाखवावी वाटत नाही,कुठेतरी वाटते की ह्या माणसांनी तो हट्ट पुरवावा, समजून घ्यावे. 
पण होते काहीतरी भलतेच, हिच लोक आपल्याला मूर्ख ठरवून, हळूहळू दूर जायला लागतात…त्यांच्या आयुष्यात आपण 
option असतो,priority कधीच नसतो हे जाणवते आणि कळते.
असं जाणवतं की त्यांच्या आयुष्यात आपल्याला कधीच, काहीच आणि कुठेच जागाच नव्हती.
घर परकं वाटणं दुखावतं,पण माणसं परकी होणं आतून तोडून टाकतं.
कारण आपण घरावर नाही,माणसांवर प्रेम केलेलं असतं.
विश्वास तुटतो,अपेक्षा कोसळतात,आणि आपण स्वतःलाच विचारतो ,“मी इथे स्वतःला एवढं मनापासून का जोडून घेतलं?”
“चूक माझीच होती का?” खरं सांगायचं तर,प्रत्येक घर आपलं नसतं…आणि प्रत्येक माणूस आपल्यासाठी नसतो.
कधी कधी आपण जिथे आपलेपण शोधतो,तिथे आपल्यासाठी काहीच नसतं,ना प्रेम, ना समज, ना जागा.
पण हे जेव्हा समजते तेव्हा आपण पूर्णपणे तुटलेले असतो,परत कधीही न सावरता येण्यासारखे,अशी जखम मिळते जी 
कधीच भरून येत नाही....

आशुतोष दंडगव्हाळ....
© 2026 Ashutosh Dandgavhal. All rights reserved.


Tuesday, March 3, 2026

समाजरचनेच्या वेदनेतून उमललेले ज्ञानाचे सूर्य


 दि. ०३/०३/२०२६..

संत ज्ञानेश्वर महाराज आणि त्यांची भावंडे – समाजाच्या त्रासातून घडलेले तेजस्वी कार्य

आज संत ज्ञानेश्वर महाराज चित्रपट पहिला,कितीदा जरी पहिला तरी मन भरत नाही,आणि प्रत्येकवेळेस नवीनच काहीतरी समजते,आहे वाटते आर हे आपल्याला माहीतच नव्हते,किंवा असेही आहे. तर असो, पण ह्या भावंडांकडे पहिले की आपण उगाच आपल्या समस्यांचा बाऊ करतो आणि स्वतःला स्वतःच त्रास करून घेतो असे वाटते, ह्यांनी जे भोगले त्यातले एक टक्का सुद्धा आपल्या नशिबी नाही तरी आपण सारखे देवाच्या नावाने, दुनियेच्या नावाने ओरडत असतो,कोसत असतो.

महाराष्ट्राच्या संतपरंपरेत संत ज्ञानेश्वर महाराज आणि त्यांच्या भावंडांचे स्थान खूप मोठे आहे. पण त्यांचं आयुष्य पाहिलं तर ते सुरुवातीपासून सुखाच कधीच नव्हतं. उलट लहान वयातच त्यांना समाजाच्या कठोर नियमांचा आणि बहिष्काराचा सामना करावा लागला. त्यांच्या वडिलांनी संन्यास घेतल्यानंतर पुन्हा गृहस्थाश्रम स्वीकारला म्हणून संपूर्ण कुटुंबाला समाजाने दूर केलं. त्या काळात हे असे खूप मोठा अपराध मानला जायचा.

लहान वयातच अपमान, उपेक्षा आणि संघर्ष त्यांच्या वाट्याला आला. पण याच गोष्टींनी त्यांना खचवलं नाही, तर उलट त्यांना घडवलं. मोठे भाऊ निवृत्तीनाथ यांनी सर्व भावंडांना आध्यात्मिक आधार दिला. त्यांनीच ज्ञानेश्वरांना मार्ग दाखवला. सोपानदेव साधेपणाने भक्तीचा मार्ग जगले. मुक्ताबाई तर अत्यंत परखड आणि धाडसी होत्या. त्यांच्या वाणीमध्ये आत्मविश्वास आणि सत्याची ताकद होती. मला वाटते की त्याच ह्या तिन्ही भावंडांच्या प्रेरणास्रोत असाव्यात,नुसत्या भावंडाच्याच का तर पूर्ण समाजाच्या त्या काळातील इतर संतांच्या.चांगदेवाना दिलेले त्यांचे उपदेश आजही प्रसिद्ध आहेत.

मला नेहमी वाटतं, जर त्या काळात त्यांना इतका त्रास झाला नसता, तर कदाचित त्यांनी सामान्य माणसासाठी ज्ञान इतक्या सोप्या भाषेत दिलं नसतं. समाजाने त्यांना दूर केलं, म्हणूनच त्यांनी समाजातील प्रत्येकाला जवळ करण्याचा मार्ग निवडला. त्यांच्या वेदनेतून करुणा आली. त्यांच्या अपमानातून समतेचा विचार जन्माला आला.

ज्ञानेश्वर महाराज आणि त्यांच्या भावंडांचे जीवन आपल्याला शिकवते की संकटे कितीही मोठी असली तरी श्रद्धा, एकता आणि ज्ञान यांच्या जोरावर आपण यश मिळवू शकतो. त्यांचे जीवन महाराष्ट्रासाठी प्रेरणादायी दीपस्तंभ आहे.

आज आपणही अनेक छोट्या-मोठ्या अडचणींना सामोरे जातो. कधी नोकरीत ताण, कधी नात्यांमध्ये गैरसमज, कधी अपयश. पण त्यांचं आयुष्य पाहिलं की जाणवतं — परिस्थिती आपल्याला संपवायला येत नाही, तर ती आपल्याला घडवायला येते. फरक फक्त आपल्या विचारात असतो.

समाजाने ज्यांना नाकारलं, त्यांनीच समाजाला दिशा दिली. संघर्ष हा त्यांच्या आयुष्यात अडथळा नव्हता; तोच त्यांच्या महानतेचा पाया होता. आपणही हे लक्षात ठेवलं, तर आपल्या आयुष्यातील त्रास वेगळ्या नजरेने दिसायला लागतील. कदाचित त्यातूनच आपलं खरं घडणं सुरू होईल.

खरे की नाही,नक्की सांगा....

आशुतोष दंडगव्हाळ.

© 2026 आशुतोष दंडगव्हाळ.

या वेबसाईटवरील सर्व मजकूर, लेख व विचार लेखकाच्या परवानगीशिवाय वापरण्यास मनाई आहे.

Sunday, January 25, 2026

" चूक की बरोबर.."?

दि. २५/०१/२६..
चूक की बरोबर?

प्रत्येक गोष्टीत चूक-बरोबर शोधणे कितपत योग्य आहे?
आपण लहानपणापासून एक गोष्ट ऐकत आलो आहोत—
“हे बरोबर आहे” किंवा “हे चूक आहे”.
शाळेतील उत्तरपत्रिका असो, समाजातील वागणूक असो किंवा 
नात्यांमधील अपेक्षा, सगळीकडे चूक आणि बरोबर या दोन चौकटी तयार केलेल्या आहेत.
पण प्रश्न असा आहे की, प्रत्येक गोष्टीत चूक आणि बरोबर शोधणे खरंच योग्य आहे का?
चूक-बरोबर ही संकल्पना कुठून येते?
चूक आणि बरोबर ही संकल्पना माणसाने स्वतःच्या सोयीसाठी तयार केली.
कायदा, नियम, शिस्त यासाठी ती आवश्यकही आहे.
पण आयुष्य फक्त नियमांवर चालत का हो, ते भावनांवर, परिस्थितींवर आणि अनुभवांवर चालतं.
जे आज आपल्याला बरोबर वाटतं, ते उद्या चूक ठरू शकतं.
आणि जे आज चूक वाटतं, तेच कधी आयुष्याचा मोठा धडा बनू शकतं.
प्रत्येक गोष्ट काळी-पांढरी नसते ना,आपण ना अनेकदा गोष्टींना दोनच रंग देतो
चूक किंवा बरोबर.पण आयुष्याच्या चित्रात करड्या छटाही असतातच की.
एखाद्याचा निर्णय त्याच्या परिस्थितीतून आलेला असतो. आपल्याला तो चुकीचा वाटू शकतो.
पण त्या व्यक्तीसाठी तोच एकमेव बरोबर मार्ग असू शकतो ना किंवा असेल.
आता हेच बघा ना,आपण नात्यांमध्ये सतत चूक-बरोबर मोजायला लागलो,
तर संवाद कमी होतो , आणि अपेक्षा वाढतात.
कधी “मीच बरोबर” सिद्ध करण्याच्या नादात
आपण माणूस समजून घेणं विसरतो.
नातं जिंकण्यापेक्षा ,वाद जिंकणं महत्त्वाचं वाटू लागतं, आणि तिथेच नातं हरवतं. मग योग्य काय?
योग्य हे नाही की चूक-बरोबर पूर्णपणे नाकारावं.
पण योग्य हे आहे की,प्रत्येक गोष्टीकडे समजून पाहावं
प्रत्येक व्यक्तीला तिच्या दृष्टीकोनातून ऐकावं
आणि प्रत्येक परिस्थितीत लवचिकता ठेवावी
कधी बरोबर असणं महत्त्वाचं नसतं,
तर समजूतदार असणं जास्त महत्त्वाचं असतं.
एकूण काय तर , आयुष्य म्हणजे
फक्त चूक आणि बरोबर यांची यादी नाही.
ते अनुभवांची, शिकण्याची आणि बदलण्याची प्रक्रिया आहे.
कधी चूक आपल्याला घडवते, तर कधी बरोबर आपल्याला थांबवते.
म्हणूनच प्रश्न असा नाही की
“हे चूक की बरोबर?”
तर प्रश्न असा असायला हवा की—
“हे मला काय शिकवतं?”
काय वाटते तुम्हाला??? नक्की सांगा..

© 2026 | लेखनाधिकार : आशुतोष दंडगव्हाळ
विचार मांडणी ही वैयक्तिक असून अनधिकृत वापरास मनाई आहे.

Thursday, January 22, 2026

"आयुष्य : प्रश्नांची अखंड यात्रा"

दि.२२/०१/२६..

( आशुतोष दंडगव्हाळ..)

आयुष्य : प्रश्नांची अखंड यात्रा...

जर आपण आयुष्याची व्याख्या तयार करायची

म्हटले तर किती तयार होतील,

अगदी जेवढी लोक आहेत तेवढ्या, 

 त्या प्रत्येकाची एक व्याख्या असेल,

आणि सगळ्याच बरोबर असतील,हो की नाही? 

माझी पण एक व्याख्या मी तयार केलीय,बघा बरोबर वाटते का...

आयुष्य म्हणजे सरळ रेषेत चालणारा प्रवास नाही.

तो वळणावळणाचा आहे.

कधी उजेडातला, तर कधी अंधारातला,

आणि प्रत्येक वळणावर उभा असतो — एक प्रश्न.

माझ्या मते आयुष्य म्हणजे

प्रश्न सोडवत पुढे जाण्याची शांत पण कठीण यात्रा.

आयुष्य आपल्याला कधीच थेट उत्तर देत नाही.

ते फक्त प्रश्न विचारत राहतं.

कधी परिस्थिती बनून,

कधी माणसं बनून,

तर कधी आपल्या आतल्या आवाजाच्या रूपात.

लहानपणी प्रश्न साधे वाटतात.

मी काय होणार?

मला काय आवडतं?

पण काळ जसजसा पुढे सरकतो,

प्रश्नांचं वजन वाढत जातं.

जबाबदाऱ्या कशा पेलायच्या?

स्वप्नं जपायची की वास्तव स्वीकारायचं?

मी जे जगतोय, ते खरंच माझं आयुष्य आहे का?

या प्रश्नांची उत्तरं कुठल्याही पुस्तकाच्या शेवटच्या पानावर नसतात.

ती वेळ देऊन उलगडतात.

कधी अपयश आपल्याला उत्तर शिकवतं,

कधी यश आपल्याला प्रश्न विचारायला भाग पाडतं.

काही प्रश्न लगेच सुटतात,

काही प्रश्न आपली झोप उडवतात,

आणि काही प्रश्न असे असतात

जे उत्तर न देता देखील

आपल्याला माणूस बनवत राहतात.

खरं तर आयुष्याचं सौंदर्य उत्तरांत नाही,

ते शोधात आहे.

प्रश्न विचारण्यात आहे.

स्वतःशी प्रामाणिक राहण्यात आहे.

प्रश्न संपले, तर आयुष्य संपेल.

कारण प्रश्नच आपल्याला चालायला भाग पाडतात,

विचार करायला शिकवतात,

आणि आतून हळूहळू घडवत राहतात.

म्हणूनच आयुष्य म्हणजे

उत्तरांचा शेवट नाही,

तर प्रश्नांसोबत जगण्याची कला आहे.

आणि कदाचित,

आपण शोधलेली उत्तरं नव्हे,

तर त्या शोधात बनलेली आपली व्यक्ती

हेच आयुष्याचं खरं फलित आहे.

Sunday, January 4, 2026

"The Intern" - Experience Never gets Old..


 Date: 03.01.2026

In the new year, I’m writing my first blog. Honestly, a lot of topics come to my mind, and by the time I think “I should write, I should write,” they fade away. But today, after watching this movie, I felt that I must write today itself.

With different taglines like “Experience never gets old, Experience never goes out of fashion,” the 2015 film “The Intern” was watched again today. This is one of my favorite movies. Its taglines themselves say a lot, but this movie still teaches much more beyond that.

There’s something special about this film. While watching it, you constantly feel that all this is happening around us. We meet these kinds of characters every day in our lives.

Actually, the tagline is absolutely true, but one more thing is strongly highlighted here — the old values about how to live a good life are still relevant today. In fact, they never become outdated. With changing times, only their form changes. The values by which our previous generation, and generations before them, lived a healthy and happy life are the same values that apply even today. If we try to live by abandoning them, life becomes complicated, or such problems arise that while trying to solve them, even bigger problems are created. At the same time, these old values solve those problems instantly and make life straight, simple, and easy.

The point of saying all this is that today we are blindly imitating Western culture. Small families, a world limited to just “us and our family,” and in the name of freedom, giving unrealistic space to each other — in this process, we have distanced ourselves from one another. Open conversations have stopped, sharing has stopped. There is no one left to give reassurance, no one to say “I am here.” Opening up one’s heart has almost stopped. This situation has taken a very serious form in Western countries, and this movie shows that clearly. And the character of Robert is shown handling that situation using those very old values.

We are still fortunate that guiding elders are still with us, and we have already inherited something from them. But it is necessary to absorb those values even more deeply and pass them on to the next generation, so that they too can live a better life.

Everyone should definitely watch this movie. What you understand while watching it cannot be explained by someone else. There are so many small things in life, but if they are not nurtured, they turn into serious problems later. Whether it is husband–wife relationships, friendships, office life — for so many issues, this movie shows simple answers through old values.

Problems that arise in work, relationships, and friendships are actually created by us. We complicate them, and then while trying to solve them, we exhaust ourselves. At such times, these old values are what truly help in solving those problems.

They don’t say “old is gold” for no reason. To give a very simple example — even today’s Gen-Z youth love Kishore Kumar’s old songs. Lata Mangeshkar and Mohammed Rafi are on their playlists too. Isn’t that interesting?

Do watch this movie at least once — both the old and the new generations together. Especially today’s younger generation should definitely watch it.

After watching the movie, which thought or value did it remind you of? Do comment and let me know… I’m waiting.

I have intentionally not written too much here, because the joy of watching the movie, experiencing it, and understanding it cannot come from reading.

Do watch it and tell me.

Ashutosh Dandgaval

" The Intern " - Experience Never gets Old...

दि. ०३.०१.२०२६.. 


नविन वर्षात ला पहिला ब्लॉग लिहितोय,खरे तर खूप विषय डोक्यात येतात आणि लिहू - लिहू म्हणेपर्यंत विरून पण जातात, पण आज हा चित्रपट पाहिल्यावर म्हटले आज लिहायचेच.

Experience never gets old, Experience never out of fashion, अश्या वेगवेगळ्या tagline ने प्रदर्शित झालेला २०१५ cha "The Intern" आज परत बघण्यात आला, हा माझा आवडत्या चित्रपटांपैकी एक चित्रपट, त्याच्या tagline च सगळं काही सांगून जातात,पण हा चित्रपट अजून हि बरेच काही शिकऊन जातो...

ह्या चित्रपटाची एक गंमत आहे, हा बघतांना असेच सारखे वाटते की हे सगळे आपल्या अवतीभवती चालले आहे, ह्या सगळ्या पात्रांना आपण रोज भेटतोय...

खरे तरी tagline वापरली आहे ते तर आहेच पण अजून एक गोष्ट ह्यात अधोरेखित होते ती की जी जुनी मूल्ये आहेत चांगले आयुष्य कसे जगावे ती आजही लागू होतात,ती खरेतर कधी जुनी होतच नाही, नव्या युगाप्रमाणे त्याचे स्वरूप फक्त बदलते. आपल्या अगोदरची पिढी,त्यांचे अगोदरची पिढी ज्या काही मूल्यांनी स्वस्थ आणि आनंदी आयुष्य जगत होते,तीच मूल्ये आजही लागू होतात,आणि ती सोडून जगायचे म्हटले तर आयुष्य complicated होते किंवा असे प्रश्न निर्माण होतात की ते सोडवायला गेले की अजून मोठे प्रश्न तयार होतात, आणि त्याच वेळेस ही जुनी मूल्ये ती सगळी प्रश्न झटक्यात सोडवतात आणि आयुष्यं सरळ साधं सोपं बनवून टाकतात.

हे सांगायचे ह्यासाठी, की आपण आज पाश्चात्य जगाचे अनुकरण करतोय अगदी कुठलाही विचार न करता, छोटे कुटुंब, आपण आणि फक्त आपले कुटुंब एवढेच जग, स्वातंत्र्या च्या नावाखाली , एकमेकांना अवास्तव स्पेस देण्याच्या  नादात एकमेकांपासून दुरावलो, एकमेकांशी मोकळे बोलणे बंद झाले,शेअर होणे बंद झाले, कोणी धीर देणारे, मी आहे म्हणणारे उरले नाही, मन मोकळे करणेच बंद झाले, ही परिस्थिती पाश्चात्य देशात कितीतरी गंभीर स्वरूप बनून राहिलेय ही ह्या चित्रपटात दाखवलंय,आणि ती परिस्थिती सावरणारा रॉबर्ट तीच जुनी मूल्ये वापरताना दाखवलाय...

आपले नशिब अजूनही चांगले आहे आपल्याला साकारणारे मोठी माणसे आजही आपल्या बरोबर आहेत, त्यांचेकडून आपण काही वारसा घेतलेलाच आहे,पण ते अजून जास्त आत्मसात करून पुढच्या पिढीला देणे गरजेचे आहे, जेणेकरून तीही पिढी उत्तम आयुष्य जगू शकेल. 

हा चित्रपट आवर्जून सगळ्यांनी पहावा, तुम्ही बघताना जेवढा तो कळेल तेवढे कोणी सांगून समजणार नाही, आयुष्यात किती छोट्या छोट्या गोष्टी असतात पण त्या जपल्या नाही तर त्याच पुढे गंभीर प्रश्न बनून पुढे येतात, नवरा - बायको, मित्र - मैत्रिण, ऑफिस, अशा कितीतरी विषयातल्या प्रश्नांवर सोपे उत्तरे देणारी जुनी मूल्ये ह्या चित्रपटात दाखवली आहेत...

काम, नातेगोते, मित्रत्व ह्यात निर्माण होणारे प्रश्न खरेतर आपणच उभे करतो,complicated करतो, आणि मग ती सोडवताना आपलीच दमछाक होते,त्यावेळेस ते प्रश्न सोडवायला ही जुनी मूल्यं च कामाला येतात...

जुने ते सोने उगाच म्हणत नाहीत, अगदी सोपे उदाहरण द्यायचे झाले तर, आजच्या gen-z तरुणाईला ही किशोरदा ची जुनी गाणी आवडतात.. लता - रफी त्यांच्याही तोंडावर असतात , आहे की नाही गंमत..

नक्की एकदा पहाच हा चित्रपट, जुन्या व नव्या पिढीनी दोघांनीही, खासकरून आजच्या तरुण पिढीने तर नक्की पहावा..

चित्रपट बघून तुम्हाला कुठली गोष्ट,मूल्ये आठवली ती नक्की कमेंट करून सांगा... वाट पाहतोय..

इथे मुद्दामच जास्त काही लिहिले नाही, कारण तो चित्रपट पाहून अनुभव घेऊन समजून घेण्यात जी मजा आहे ती वाचून नाही जमणार...

नक्की पाहा आणि सांगा..

आशुतोष दंडगव्हाळ...






" तो फक्त हसत राहिला...आणि आतून तुटत गेला..."

दि.३०/०५/२०२६... आजकालच्या जगात माणसं खूप जोडली गेली आहेत… फोनमध्ये contacts वाढले, social media वर followers वाढले, गप्पा वाढल्या, status व...