Friday, November 25, 2022

" Walk a mile in my shoes "...


 दि.२४ नोव्हेंबर २०२२...

" Walk a mile in my shoes "......

तुम्हाला लेखाचे शीर्षक वाचून अंदाज आलाच असेल लेख कशावर असेल ह्याचा? शीर्षक मुद्दाम इंग्रजीतून घेतलेय,कधी कधी जलद परिणामा साठी इंग्रजीचा आधार घ्यावा लागतो😜,हा झाला गमतीचा भाग,असो तर लेखा कडे वळू यात.

एखाद्याला समजून घ्यायचे असेल तर त्याचे सारखे किवां त्याचे आयुष्य जगायला हवे,असा साधारणसा त्या शीर्षकाचा अर्थ निघतो,पण पुढे अजून खोलात गेलो तर खूप मोठा अर्थ त्यात लपलाय. आपण नेहमी कोणांकोणाला त्याची बाजू समजून न घेता तो चूक किवां बरोबर ठरऊन मोकळे होतो,त्यावर मोठमोठ्याने चर्चा करून त्याला आरोपीच्या पिंजऱ्यात  उभे करतो किवा अगदी निर्दोष माणूस ठरऊन मोकळे होतो,खरंच आपण हे बरोबर करतो काहो ?.. कधी आपण हा प्रश्न स्वतःला विचारायची हिम्मत दाखऊ शकू का? एखाद्या अमुकतमुक घटनेकडे बघताना आपण किती सहज पणें त्या घटने संबंधित व्यक्तीला न पाहता, न ओळखता,  तो/ती व्यक्ती जे वागला/वागली , त्या वेळेसची परिस्थिती काय होती,कशी होती,का होती, ह्याचा कुठलाही मागचा पुढचा विचार न करता त्या व्यक्तीला आरोपी वा निर्दोष ठरवणे कितपत योग्य? कधी स्वतःला त्या व्यक्तीच्या जागी ठेऊन ,त्यावेळेस आपण कसे वागलो असतो हे पाहण्याची तसदी आपण का घेत नाही? काय येवढी घाई झालेली असते आपल्याला समोरच्या चा न्यायनिवाडा करायचा?

समोर दिसतेय ते खरेच तसे आहे की त्याला दुसरीही काही बाजू आहे,हे पाहायला आजकाल कोणी तयारच नसतो,सरळ निष्कर्ष काढून मोकळे. साधे उदाहरण घ्यायचे झाले तर हा संवाद बघा, " अहो काय अमक्यातमक्याची मुलगी वेळ-काळ न बघता सारखी बाहेर उंडारत असते". झाले त्याचेबरोबर समोरचाही त्या मुलीबद्दल काहीतरी विचार करून तिला चुकीचे वागते ठप्पा मारून मोकळा होतो. आता इथे गंमत बघा, ती मुलगी कशाला बाहेर जाते,का बाहेर जावे लागते,ती काय करते बाहेर जाऊन,ह्या एकाही प्रश्नाचे उत्तर ह्या महाभागांकडे नसते,तरीही तिच्या वागण्यावर ताशेरे ओढून मोकळे. मग त्यातला एखादा कुतूहल म्हणून तिच्या अश्या बाहेर जायचे कारण शोधतो आणि मग खरे कारण समोर आल्यावर हीच सगळी मंडळी म्हणणार,अरे काय हिंमतवान मुलगी आहे, आई -वडील आजारी, घरातला खर्च,औषधपाण्या चा खर्च,कोणी मदतीला नसताना सगळे एकटीने सांभाळतिये,त्यासाठी बाहेर चार चार ठिकाणी नोकऱ्या करत वणवण फिरतीये,असे म्हणून हळहळणार. अरे बाबांनो मग हेच अगोदर का नाही केले? ह्या अगोदर तुमच्या बोलण्याचा तिला,तिच्या आई - वडलांना किती त्रास झाला असेल ह्याचा विचार आला का मनात?

अजून एक किस्सा बघा, एक काकू दुसऱ्या काकूंना सांगत असतात " अगं काय सांगू तुला, माझ्या ननंदेची मुलीं ने  पळून जाऊन लग्न केले,सगळ्या खानदानाचे नाक कापले पोरीने, आई - वडलांना बाहेर तोंड दाखवायला जागा ठेवली नाही कार्टिने ,आणि अजून बरेच काय काय, पण आमच्या ननंद बाईंनी काही एक न बोलता सगळे मुक्याट्याने समजून घेऊन,दोघांना माफ केले,आणि घरात घेतले,मी असते तर थोबाड फोडले असते पोरीचे,नाहीतर कापूनच टाकले असते". आता काही दिवसांनी ह्याच कापून टाकले असते म्हणणाऱ्या काकूंची मुलगी पळून गेलीय आणि निरोप पाठवलाय की आम्ही लग्न करतोय आणि इकडेच राहणार आहोत,काळजी करू नये. आता ह्या वर ह्या कापून टाकणाऱ्या काकूंची reaction बघा बरका, " अगं काय ह्या आजकालच्या मुलांपुढे आपले काही चालते का,पण हो,आमच्या सुलूने मुलगा भारी निवडलाय हो, चांगला कॉम्प्युटर इंजिनिअर आहे, आयटीत कामाला आहे" आहे की नाही गंमत. आता त्या ह्यांच्या ननंद बाईंच्या मुलिनेही असाच चांगला देखणा ,हुशार, चांगली नोकरी असणारा,तिच्याच फील्ड मधला मुलगा शोधलेला असतो. पण ह्या काकू त्यांचेबद्दल कश्या बोलतात आणि स्वतःच्या मुलीबद्दल कश्या react होतात, आहे की नाही गंमत..
असेच कितीतरी किस्से वेगवेगळ्या परिस्थितील सांगता येतील, आणि ती लिस्ट मारुतीच्या शेपटी सारखी न संपणारी असेल.

आपणही ह्या अश्याच परिस्थितीला कधीतरी सामोरे गेलो असतो, ह्या अश्या बोलण्याने समोरच्याला किती त्रास होतो हे ह्या अश्या वाचाळविर लोकांना कळत नाही,वेळच त्यांना बरोबर शिकवते.....

पण खरंच आपण हे वाक्य मनात कोरून ठेवायला हवे,कोणाबद्दल मत बनवताना हे वाक्य आठवले पाहिजे,हो की नाही? काय वाटते तुम्हाला?...

आशुतोष दंडगव्हाळ......

Monday, November 7, 2022

"ज़िन्दगी ख्वाब है"....!!!


 दि.०७/११/२२..


"ज़िन्दगी ख्वाब है"....!!!

परवा काही गाणे ऐकण्यात आले, विषय होता जीवन आणि स्वप्नं. प्रत्येक गाण्यात आयुष्याला / जीवनाला स्वप्नांशी जोडले होते, त्यातले एक " जागते रहो" चित्रपटातले होते, " जिंदगी ख्वाब है" ते गाणे ऐकल्यावर विचार आला खरंच की, आयुष्य म्हणजे स्वप्नच तर आहे, स्वप्नाशिवाय काय वेगळे असू शकेलं ?

आपण आपले आयुष्य आपल्या स्वप्नांच्या अवतीभोवती तर विणतो, त्या स्वप्नांना उराशी कवटाळून तर जगत असतो, सारखे ती पूर्ण कशी होतील ह्याच प्रयत्नात असतो, मग काय हरकतये म्हणायला, की जीवन म्हणजेच स्वप्नं, तुम्हाला काय वाटते...?

अगदी जन्मापासून विचार केला तर त्या बाळाची स्वप्नं काय, आईचे दूध मिळेल, छान पैकी आईच्या कुशीत झोपता येईल, सगळे लाड करतील, येवढे मिळाले की त्याचे जीवन पूर्ण आणि तृप्त.

थोडे मोठे झाले की खूप खाऊ,खूप खेळायला मिळणे,चांगली चांगली खेळणी ह्याशिवाय कुठली स्वप्नं पाहतो आपण,तेवढे मिळाले की मोठेपणी अगदी सगळ्यांना सांगतो माझे लहान पण खूप छान गेले. शेवटी काय तर प्रत्येक क्षण स्वप्नं पाहण्यात आणि ती पूर्ण करून घेण्यात किवां पूर्ण करण्यातच आपण असतो. शेवटी काय तर स्वप्नांवरच आपण जगतो.तेच आपले जीवन.

स्वप्नच तर असतात जी आयुष्याला रंगीत किवां बेरंग करतात, कधी रडवतात,कधी हसवतात, कधी पटकन पूर्ण होतात,कधी होता होता राहून जातात, त्यातूनच मग माणूस म्हणतो माझे आयुष्य सुंदर आहे / वाईट आहे. म्हणजे शेवटी काय तर स्वप्नच ठरवणार तुम्ही आनंदी राहणार की दुःखी.

दिलीप कुमार चे मधुमती मधले गाणे आठवते का, " टुटे हुये ख्वाबो ने हमको ये सिखाया हैं I दिल ने जीसे पाया था आखों ने गवाया है I " 

स्वप्नं बघायची आणि ती पूर्ण करायची,तरच आयुष्य रंगीत आणि सुखी होईल,नुसतीच उघड्या डोळ्यांनी स्वप्न पाहणाऱ्या चे आयुष्य दुःखातच जाणार,हो की नाही.....


आशुतोष दंडगव्हाळ......



" तो फक्त हसत राहिला...आणि आतून तुटत गेला..."

दि.३०/०५/२०२६... आजकालच्या जगात माणसं खूप जोडली गेली आहेत… फोनमध्ये contacts वाढले, social media वर followers वाढले, गप्पा वाढल्या, status व...