नुकतेच घट ,दसरा संपन्न झाला, नऊ दिवस नवरात्रीचे कसे गेले कळले नाही, त्यात सगळीकडे गरब्याची धूम होती, लॉक डाऊन नंतरचे मुक्त असे सेलिब्रेशन सगळ्यांनी साजरे केले. सगळीकडे नव चैतन्य - उत्साह नुसता सळसळत होता.
गरबा दांडिया ची धूम सगळीकडे होती,कॉलेज ला असताना आमचा ग्रुप दांडियाची महिनाभरापासून तयारी करायचा, मुलींचे ड्रेस, दागिने ही तयारी तर मुलांची विविध दांडिया ग्रुप ची पासेस मिळवायची सेटिंग चालू असायची. एकदा चे पास हातात आले की हुश...
हे सगळे आठवायचे कारण ह्यावेळेस आमच्या घराजवळच दांडियाचे नियोजन केले गेले होते, रोज जाऊ जाऊ ठरऊन ही जाणे होत नव्हते,आज शेवटचा दिवस होता म्हणून आम्ही सहपरिवार दांडियाला पोचलो,नेहमीचेच वातावरण,काहीही change झाले नव्हते,तीच मुला मुलींची गर्दी नटून सजून आलेली तरुणाई, आत मध्ये जायची गर्दी. सगळे पाहून परत जुने आमचे दिवस आठवले.
आतमध्ये गेलो, आरती झाली आणि दांडीया ला सुरुवात झाली, धुंद होऊन मुले मुली च नाहीतर अगदी ६० -७० वर्षाची मंडळी पण हौस भागऊन घेत होती.
सहज सगळ्यांकडे लक्ष गेले, किती प्रकार होते त्यात,कोणी नुसतेच बघायला आले होते, कोणी त्यांच्या लहान मुला मुलींना नटून थटून आणले होते,ती छोटी छोटी बच्चे कंपनी मोठे काय नाचतील इतके छान ठेका धरून नाचत होती, सगळ्यांचे मोबाईल त्यांचे फोटो ,व्हिडिओ काढण्यात मग्न होती, तरुणाई तर वेगळ्याच जगात होती, कोणी जोडीदाराबरोबर मुग्ध होऊन दांडीया खेळत होती, काही नुकतेच सजून धजून फोटो काढण्यात मग्न होती. ह्या लोकांना फक्त फोटो आणि सेल्फी काढण्यातच मजा येत होती. काही प्रौढ कपल्स अगदी ठरऊन नऊ दिवस न चुकता वेगवेगळी वेशभूषा करून सुरुवातीपासून ते थेट बंद होईपर्यंत खेळत होती. त्यांना कोणी डिस्टर्ब केलेले अजिबात आवडत नव्हते.
त्यात काही बायका - माणसे अगदी धुंद होऊन दांडीया खेळत होती, माझ्यामते त्या दांडियात मुग्ध होउन दांडीया खेळून त्यात अगदी दमून जाऊन त्यांच्या संसारातील सगळा त्रास, थकवा, रुसवा-फुगवा ,नाराजी,मनाविरुद्ध कराव्या लागणार adjustment, ऑफिस च्या कटकटी, खर्चाचा मेळ बसून बसून दमलेला तो - ती विसरण्याचा प्रयत्न करत असतील का? कुठे बोलता येत नाही तर दांडीया खेळून त्या देवीसमोर त्यांचे मन मोकळे करून घेत असतील का?
ते काहीही असो, पण खरेच कधी कधी असे वाटते की आजकालच्या जगात जिथे मोकळेपणाने कोणा समोर व्यक्त होता येत नसताना अशी जागा जिथे त्या देवीसमोर तिचे नामस्मरण करून तिच्या नावाचा जागर करत स्वतःला मुग्ध, सैल सोडून सगळा मनातला गोंधळ,त्रास काढून टाकता यावा ह्यासारखे सुख ते काय. दांडीया खेळून सगळी दमत नसतील,तर सगळे मनातले निघून गेल्यावर मन शांत झाल्यावरचा तो गोड थकवा असावा.
आपल्याला नेहमी सांगितले जाते आपल्याकडील प्रत्येक प्रथेला काहिन काही वैद्यकीय आधार आहे, ते सगळे खरेच आहे ह्याचा प्रत्यय ह्या नऊ दिवसात सगळ्यांना येत असेल हो की नाही....
आशुतोष दंडगव्हाळ...
