Friday, March 30, 2018

" द बकेट लिस्ट "

दि. ३०.३.२०१८.

द बकेट लिस्ट......( मन मारून जगणे/जगवणे नको )

एक सुंदर इंग्लिश चित्रपट पाहण्यात आला," the bucket list". मॉर्गन फ्रीमन आणि जॅक निकोलसन ह्या दिग्गज कलाकारांनी जिवंत केलेला हा चित्रपट, विषय तसा आपल्याला न आवडणारा, चित्रपटात दोन मरणासन्न पात्र आहेत जे स्वतःचे आतापर्यंतचे आयुष्य कसे जगले,आणि ते जगताना खूप काही स्वतःसाठी करायचे किवा जगायचे जे राहुन गेले, त्याची एक यादी  बनवतात,आणि त्या यादीतील गोष्टी कश्या पूर्ण करतात ह्यावर संपूर्ण चित्रपट, बघताना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते ती ही की आपलिही अशीच बकेट लिस्ट तयार होऊ शकते. आपणही आयुष्यात खूप काही सोडून देतो, कधी परिस्थिती,पैश्यामुळे, कधी वेळे मुळे, कधी जबाबदाऱ्यान मुळे. कारणे बरीच असतील, पण राहून जाते खरे.

आपले आयुष्य तसे खूप साधे असते,थोडा प्रयत्न केला तर प्रत्येकालाच स्वतःसाठी वेळ काढणे जमू शकते, मग आपल्या कडून तो स्वतःसाठीचा वेळ काढणे का होऊ नये?( कधी कुठे पैशांमुळे पण असू शकेल, पण खरंच सांगतो आपण आपल्या कुवतीमधलीच स्वप्नं बघत असतो, त्यासाठी लागणारा पैसा पण असतो,पण आपण तो स्वतः वर खर्च करण्या पेक्षा दुसरीकडे खर्च करतो.) आपल्याला सगळ्यांना एक किडा चावलाय, मीपणाचा. मी नसेन तर असे होईल,मी नाही केले तर कोण करेल, जसे काही आपल्यामुळेच जग चालू आहे, आपण नसलो तर जगबुडी होईल हे आणि असेच काहीसे. खरे सांगायचे तर तुम्ही असल्या-नसल्याने जग चालत किवा थांबत नाही, कोणाचे आडतही नाही. जरा तो मीपणा, लोकांच्या नजरेत मोठे व्हायची हौस सोडली तर अशी बकेट लिस्ट बनवायची वेळ आपल्यावर येणार नाही.

आपल्या ह्या मी पणा मुळे,आपल्या जवळ राहणाऱ्या लोकांची सुद्धा अशीच बकेट लिस्ट तयार होऊ लागते, मग, त्या तुमच्या मोठेपणा करण्याचा फायदा कोणाला,हा विचार व्हायला हवा. स्वतः मन मारून जगतो तर जगतोच, पण स्वतः बरोबर सोबत राहणाऱ्या माणसालाही मन मारायला लावतो,हे कुठले जगणे, ह्यात कुठले मोठेपण...प्रश्न पडतो,पण उत्तर शोधायची तयारी मात्र आपण दाखवत नाही,असे का..

ह्यातून स्वतःसाठी पेक्षा कधी कधी ह्याचीच खंत जास्त वाटते की आपण एखाद्याला आपली गरज असताना त्याचेसाठी आपण काही करू शकलो नाही,भेटू शकलो नाही. ही आणि अश्या बऱ्याच गोष्टींची बकेट तयार होत राहाते.

पण अशी बकेट लिस्ट बनवण्याची वेळच येऊ दिली नाहीतर किती छान...... स्वतःचे आणि आपल्या बरोबर राहणाऱ्यांन च्या मनासारखे जगण्याचा प्रयत्न करून बघायला काय हरकत......

आशुतोष दंडगव्हाळ....


Tuesday, March 27, 2018

" योग्य वेळ "

दि.२७ - ३ - २०१८


"योग्य वेळी योग्य गोष्टी ह्या व्हायलाच हव्यात" ......

आपल्याकडे बरेचदा आपण हे वरील वाक्य घरातील थोरा-मोठ्यांच्या तोंडून ऐकत आलोय,ऐकतोय आणि आज आपणही ते सांगतोय. पण खरंच ते वाक्य किती बरोबर आहे, आयुष्यात किती महत्वाचे आहे,  ते तुम्हा/ आम्हाला  स्वतःची चाळिशी ओलांडल्या शिवाय कळत नाही.

आजुबाजूला जेव्हा बघतो, काही प्रसंगांना सामोरे जातो,कधी आपल्या कीवा कधी आपल्या आजुबाजूच्या लोकांच्या आयुष्यात असे काही प्रसंग येतात त्यावेळेस नक्कीच प्रत्येकाला ह्या वाक्याची आठवण होते,होत असेल,कोणी प्रांजळपणे कबुली देतो, बाकीचे मात्र ते न मानता दुसऱ्यावर खापर फोडून ती कबुली देणे टाळतात. एकूण काय तर ते वाक्य आपण कुठेतरी आयुष्यात मानलेले नसते,त्यावाक्क्याची आठवण ठेवलेली नसते, त्याचे परिणाम म्हणून आपण काही गोष्टींना आयुष्यात मुकतो, कीवा त्या आपल्याला परत मिळत नाहीत.
योग्य वेळी शिक्षण,व्यवसाय/नोकरी, प्रपंच,स्वप्नं सत्यात आणण्यासाठी प्रयत्न करणे,सगळ्याच जागी योग्य हा शब्द हवाच,त्याला सोडून आयुष्य नाही.

माझे स्वतःचेच उदाहरण घ्या, मी योग्य वेळी योग्य डॉक्टर कडे गेलो असतो तर आज माझे दोन्ही कान शाबूत असले असते,पण मी ते नाही केले आणि आयुष्याचे नुकसान करून घेतले,आता एका कानावर अवलंबून आहे, त्याचापण काही भरवसा नाही कधी बंद होईन,पण आता माझ्या हातात काहीच नाही.

हया वाक्यात दोन शब्द महत्वाचे एक " योग्य" आणि दुसरा "वेळ". वेळ जी एकदा गेली की परत येत नसते,काहीही केलं तरी परत मिळणार नसते, आणि वेळ तर भरपूर होता हो पण तो योग्य प्रकारे, योग्य ठिकाणी वापरला गेला नाही तर त्या वेळेला पण किंमत राहात नाही. म्हणून ह्या दोन्ही शब्दांचे महत्त्व ज्याला कळले,ज्यांनी त्या दोन शब्दांचा वापर आयुष्यात नीट केला ते नेहमीच यशोशिखरावर असतील, आणि आहे तसेच.

आपण आज बाजारात ज्या लोकांची पुस्तके मार्गदर्शनासाठी घेतो,त्यात ह्या वाक्क्या शिवाय दुसरे काय असते बरे.  अश्याच लोकांच्या आयुष्यावरची पुस्तके मग आपण यशस्वी होण्यासाठी घेतो,वाचतो,पण त्यावेळेस आपल्या हातातून ही दोन्ही ( योग्य आणि वेळ ) गेलेले असते.

हो पण वेळ निघून गेली,किवा संधी गेली म्हणून प्रयत्न करणे सोडू नयेत, फक्त होते ऐवढेच की प्रयत्न जास्त करावे लागतात आणि वाट पहावी लागते.

शेवटी महत्वाचे काय तर हेच की " योग्य वेळी योग्य गोष्टी व्हायलाच हव्यात."

आशुतोष दंडगव्हाळ.....




Tuesday, March 20, 2018

" नात्यान पलीकडची नाती "

नात्यान पलीकडची नाती.....

भारतीय माणूस नेहमी आपल्या नातेवाईकांमध्ये रमणारा,सगळ्यांना अभिमानाने सांगेल आमचे येवढे नातेवाईक आहेत,असे तसे. पण ज्या वेळेस आपण कामानिमित्त कुठेतरी दूर जातो त्यावेळेस त्या नवीन जागेत जी नाती निर्माण होतात ती खूप वेगळी असतात,त्या नात्यांना नाव कुठलेच नसते,पण ती तरीही खूप घट्ट आणि हवीहवीशी वाटणारी असतात, त्या अनोळखी प्रदेशात खंबीर पाठिंबा देणारी असतात, खऱ्या नात्यांपेक्षाही मोठी होऊन जातात.आणि हो ह्या नात्यांचे एक असते ही नाती जातपात, लहानमोठे,गरीब श्रीमंत,असले काही बघत नाही,अठरापगड जातींचे लोक ह्यात एकत्र येतात एक नवा समाज तयार होतो,हो गरजेपोटी पाहिले एकत्र येतात पण त्यातून अशी नाती निर्माण होतात की मग गरज तिथे दुय्यम होऊन जाते.
वडील शासकीय खात्यात,त्यामुळे आमचे घर म्हणजे विंचवाच्या पाठीवरचे बिऱ्हाड, आज ह्या गावात तर उद्या त्या गावात, कधी ऐके ठिकाणी 2-3 वर्ष सलग राहिलेलो आठवत नाही. नोकरीच्या जागा पण अश्या, किनवट, परभणी,नांदेड, अजून कुठली कुठली खेडी. सगळे नातेवाईक औरंगाबाद,पुण्यात आणि आम्ही दूर दुसऱ्या टोकाला. त्यावेळेस आजच्या सारखे गाड्यांची सोय नव्हती येण्याजाण्यासाठी, क्वचित एखादी एस टी असायची,त्यामुळे सहसा नातेवाईकांची भेट वर्षातून एकदा कीवा कधी दोन वर्षांतून एकदा, पण मग जिथे राहायचो तिथेच आजुबाजूला ही अशी पल्याडली नाती निर्माण झाली कधी झाली कशी झाली ते नाही कळाले,पण मग आजोबा ,आजी,मामा, बहीण भाऊ किती तरी,काही अशी ज्याला नावसुद्धा नव्हते.
किनवट च्या आम्मा( खोजा जातीतील ह्या धिप्पाड, नजरेत जरब असणाऱ्या ) , माझ्या आईला त्या मुलगी मानायच्या, मुलीप्रमाणे त्यांनी तिला सांभाळले, तिथलेच खान डॉक्टर,. परभणीचे सरदेशपांडे काका काकू,त्यांची मुले, लहानपणी मी सकाळी उठलो की त्यांच्या घरी माझे बाकीचा दिवस जायचा,असे आई सांगायची,तिथलेच दाभाडे कुटुंब, असे कितीतरी , ती नावे न संपणारी.
मला जास्त आठवते  ते देगलुर (त्यातल्या त्यात ह्या गावात जरा 4-5 वर्षे सलग काढली आणि थोडा मोठा झालो होतो म्हणून  इथले सगळे आठवते ). पपांच्या ऑफिस मध्ये एक सोनिकाका शिपाई म्हणून होते, आम्ही दोघे भावंडं ह्या माणसाकडे च जास्त असायचो, अगदी आजोबांपासून मित्रा पर्यंतचे सगळी नाती त्यांच्यात एकवटली होती, खांद्यावर बसून फिरवणारे सोनीकाका, गणपतीत अामचेकडून डान्स बसऊन घेणारे डायरेक्टर,अजून काय काय, टेलर काका ते व त्यांचे कुटुंब, कुठला तरी सण होता, आईला तिच्या माहेरची खूप आठवण येत होती म्हणून ती रडत होती त्याच वेळेस टेलर काका घरी आले होते ,तिला तसे रडताना पाहून त्यांचे डोळ्यात पाणी आले,ते तिला म्हणाले पोरी आजपासून माझे घर म्हणजे तुझे माहेर,परत असे सणाला रडायचे नाही,त्यादिवसापासून आईला एक माहेर मिळाले. . तिथेच मुलासारखे प्रेम करणारे गायकवाड काका आणि तबला शिकवताना एकदम कडक गुरु,दोन्ही कसे जमायचे त्यांना ते समजायचे नाही, शिकवताना पोराला मारले म्हणून नंतर स्वतःच रडायचा हो हा माणूस.
असंच एक कुटुंब ज्यामुळे माझ्या आयुष्याला अर्थ आला,आज जो काही मी आहे, जे काही मी मिळवले ते कापसे पती,पत्नि मुळे,त्यांनी मला ऐकु येत नसताना,कानाचा आजार माहीत असताना मला नोकरी दिली ,आणि माझेवर जो विश्वास दाखवला तो दुसरे कोणी करू शकले नसते, माझ्या आजारपणात ह्या दोघांनी जी काही मदत केली ती विसरणे कदापि शक्य होणार नाही, काय नाते होते त्यांच्याशी माझे बॉस होते माझे ते,पण परत इथे तेच अदृष
 नाते काम करून गेले.
औरंगाबादचे घाटगे काका काकू , विजन अंकल ( माझे पुण्यात कॅन्सर चे ऑपरेशन झाले होते,त्यावेळी त्यांची स्वतःची तब्बेत बरी नसताना आजोबांच्या वयाचा हा माणूस,25 km वरून मला हॉस्पिटल मध्ये बघायला आले होते. आणि हो स आम्ही जिथे राहतो तिथे मला एक गोड बहीण आणि पंत मिळालेत,काकडे पती पत्नी.

ही अशी माणसे आणि अजून कितीतरी, लिहायला जागा अपुरी पडेल,  ती माणसे ती नाती आयुष्यातून कधीच काढून टाकू शकत नाही कीवा विसरुपण शकत नाही....

आशुतोष दंडगव्हाळ.....

Friday, March 16, 2018

" भरल्या ताटावरून "

भरल्या ताटावरून....
सगळीकडे सध्या चर्चा आहे ती बॉलिवूड क्वीन श्रीदेवी च्या अकाली मृत्यूची,तिच्यावर खुप वेगवेगळे मेसेजेस सोशल मीडयावरून फिरतायेत. खूप जास्त चर्चा होतीय असे नाही वाटत, तीच्या मृत्यूच्या बातमीनंतर जगात,भारतात खूप काही घडले,पण त्यावर काहीच चर्चा झाली नाही किवा त्याबद्दल जास्त बोलले गेले नाही, का असे,सहज मनात विचार आला तिच्या अचानक असे जाण्याचा  ( भरल्या ताटावरून उठू नये ) ह्या मराठी म्हणीशी काही संबंध असेल का?
आपल्याकडे घरातले मोठे नेहमी बोलताना ऐकलेय कितीही काही झाले तरी भरल्या ताटावरून उठून जाऊ नये, खरंच आपल्याला असे जाणे किवा कोणी असे करणे आवडत नाही, सगळे चांगले चालू असताना,सगळे सुख आले असताना,अचानक कोणी जर गेले तर,बोलताना सगळे म्हणतात,आता कुठे बरे दिवस आले होते,सुख भोगायचे तर हा/ही असा सगळे सोडून निघून गेला/गेली.
हेच आणि असेच काहीसे श्रीदेवी च्या जाण्याबद्दल वाटत असेल लोकांना,म्हणून त्याची जास्त चर्चा होत असली पाहिजे. तिचे अगोदरचे खडतर आयुष्य,त्यानंतर आलेले सुख,छान छोटेसे कुटुंब,मुलीचे करिअर,स्वतःचे चित्रपट,सगळे सगळे छान चालू,सुरू असताना( हो अर्थातच हे सगळे पेपर किवा सिने मॅगझिन मध्ये वाचलेल्या माहितीवरून बोलतोय) तिचे असे एक्झिट होणे कोणालाच रुचले नसावे म्हणून  त्याबद्दल येवढी चर्चा.
साधे पिक्चर मध्ये शेवटी सगळे आलबेल होत असताना हिरो आणि खलनायकाचे धिशुंधिशुं होताना हीरो चा मृत्यू दाखवला तर तो आपल्याला आवडत नाही,ते ह्याच मुळे असावे.

आशुतोष दंडगव्हाळ....

Tuesday, March 13, 2018

" भाषा दरिद्रता "

भाषा
सकाळी उठल्या उठल्या सगळ्यात महत्वाचे आणि पहिले काम, व्हॉटसअप उघडून बघणे ते मी करत होतो ( काही लोक अजुनही कराग्रे वसते लक्ष्मी किंवा अजून सकाळचे काही श्लोक म्हणतात सकाळी, अगदीच old-fashioned बुवा 😉) नेहमीप्रमाणे गुड मॉर्निंग चे आणि कुठल्या कुठल्या इंग्लिश सायंटिस्ट आणि सेंट्सची शुभ वचने आली होती. नाही म्हणायला एखाद् दुसरा स्वामी विवेकानंदांचा मेसेज असतो कधी कधी, पण खूप कमी.
प्रश्न असा की भारत भूमी संतांची, तत्ववेत्त्यांची भूमी, तिथे शुभ विचारांची, तत्वज्ञानाची काय कमी, मग आपल्याला इंग्लिश विचारवतांच्याच वचनांची काय गरज, इथे कितीतरी थोर संत महात्मे, विचारवंत होऊन गेले, आहेतही, मग आपल्याला इंग्लिश, युरोपियन, किंवा अजून तत्सम बाहेरच्या विचारवंतांची गरज का पडावी?  डोक्यात विचार चालू झाला, आणि थोडे आजुबाजुला बघायला सुरुवात केली, मी स्वतः जी पुस्तके वाचायला घेतली होती त्यातली 70% पुस्तके इंग्लिश लेखकांची होती, बाकीची आपल्याकडील. मग लेकीची शाळेतली पुस्तके उघडली तीही बरीचशी बाहेरच्या विद्यापीठातील, त्यात भारतातल्या विचारवंतांचे, किंवा संतांची उणीव प्रकर्षाने जाणवली. मुलीला शाळेत सोडल्यावर सहज शाळेच्या भिंतींवर लक्ष गेले. तिथेही इंग्रजी संतांचीच वचने दिसली.आम्ही शाळेत असताना शाळेतल्या भिंतींवर सर्व मराठी संत, विचारवंतांची वचने लिहिलेली असायची. तीच समजून घेता घेता आयुष्य कमी पडतेय, कधी कुठल्या बाहेरच्या विचारवंतांची गरजच पडली नाही.
 मग आत्ताच आपल्याला व्यक्त व्हायला, चांगल्या विचारांसाठी, किंवा इंग्रजी भाषेची, बाहेरच्या विचारवंतांची का गरज पडते? ह्याला कारणीभूत कोण? आपली शिक्षणपद्धती, आपले वाचन, आपली भाषा दरिद्रता, का आपल्या भाषेत व्यक्त होता न येणं? आपल्याला काही सांगायचे ते आपल्या भाषेत सांगता न येणं, का त्याला आपल्या भाषेत शब्दच नाहीयेत असे वाटणं, का आपल्या भाषेत सांगायची लाज वाटणे, काय काय कारण असावे? का असे व्हावे, साधे कोणासमोर प्रेम व्यक्त करायला इंग्रजी भाषेचा आधार घ्यावा वाटतो, मराठीत सांगितले तर ते प्रेम नसते का, त्याला किंमत राहत नाही का? आज खरंच आपण इंग्रजीच्या एवढ्या आहारी गेलोय की स्वतःच्या भाषेची , की स्वतःच्या भाषेत व्यक्त होण्याची, स्वत:च्या साधू संतांच्या वचनांची, तत्ववेत्त्यांची लाज वाटायला लागलीय की काय तेच कळत नाही.

आशुतोष दंडगव्हाळ...

Sunday, March 4, 2018

" मिसळ - पाव "

" मिसळ पाव "
शनिवारची संध्याकाळ,  रविवारचा सकाळचा मिसळपाव चा बेत आखला,
आम्ही सगळ्यांनी आनंदानी त्या मेनुला मान्यता दिली,लागलीच हातोहात फरसाण आणून घेतले, पावाचे काय,ती म्हणाली ते मी सकाळी आणते.
सकाळी कधी नव्हे ते मी म्हणालो,पाव मी आणतो,त्यावर ती ठसक्यात म्हणाली तुम्हाला तो देणार नाही,माझ्यातला पुरुष जागा झाला,असे कसे तो नाही तर दुसरा,आणि तो मला का नाही देणार,त्याला धंदा नकोय का? त्यावर ती अजून जोरात म्हणाली उगाच नाही तिथे लक्ष घालू नका,मी आणते,त्याने नाही दिले तर तुमचेच वांदे होतील,त्याचे कडचेच पाव तुम्ही खाता बाकीचे तुम्हाला आवडत नाही,आमचेपण नाश्त्याच्या विचका करू नका.
आता तर मी पेटून उठलो,म्हटले काही झाले तरी पाव मीच आण नार.
मी शूर शिपाई पाव आणायच्या कामगिरीवर निघालो, जाताना तरी हिने शेपटीवर पाय दिलाच,त्याने तुम्हाला नाही म्हटले तर त्याला सांगा," वो अॅक्टिवा पे मॅडम आती है ना हमेशा उन्होंने बोला करके". असे सटकले माझे पण तो राग गिळून कामगिरीवर लक्ष ठेऊन निघालो.
पाव वाल्याकडे आलो,त्यांचेकडे मरणाची गर्दी, म्हटले च्यायला घरी लोक स्वयंपाक करतात की नाही, त्या गर्दीत कसेबसे त्या भय्यासमोर जाऊन सांगितले 4 पाव लादी देना. त्याने माझे कडे ना बघता सरळ सांगून टाकले,सिर्फ पाव नाही मिलेगा. त्याला  सगळे आमिषे दाखवून झाली,तरी बाबा दाबून नाहीच म्हणाला. तेव्हा कळाले पाव आणणे सोपे नाही राहिले,मला हीचा चेहरा दिसत होता खदखदून हसणारा,कसे जिरवले ते.
म्हटलं तिचेच नाव सांगून बघावे,तुला थोडी कळणार आहे,सांगू घरी आपणच आणले म्हणुन. मग त्या भय्याला हिने सांगितलेले वाक्य ऐकवले, क्या साब पहिले बोलनेका ना,मॅडम को बोलो एकदम ताझा पाव है आज. मी आपला मुस्कटात मारल्यासारखे चुपचाप पावाच्या लाद्या पिशवीत टाकून घरी युद्ध जिंकल्यासारखे आलो. घरी तरी हिने विचारलेच काय माझेच नाव सांगितले ना? 😬😬 मी आपला चुपचाप मिसळ पाव खात होतो,परत कधीच पाव आणायला जायचे नाही ही मनात खूणगाठ बांधून😛😔😊😊

आशुतोष दंडगव्हाळ....

" तो फक्त हसत राहिला...आणि आतून तुटत गेला..."

दि.३०/०५/२०२६... आजकालच्या जगात माणसं खूप जोडली गेली आहेत… फोनमध्ये contacts वाढले, social media वर followers वाढले, गप्पा वाढल्या, status व...