Tuesday, April 7, 2020

" पाळीव प्राणी "

दि.२९.०८.२०१९
"पाळीव प्राणी"
अगदी बालवाडी पासून आपण शिकत आलोय पाळीव प्राणी - हिंस्त्र प्राणी. सहसा पाळीव म्हटले की आपल्या समोर, गाय,बैल,मांजर,कुत्रा ह्यापेक्षा जास्त काही आपल्या डोळ्यासमोर येत नाही, निदान माझ्या तरी. तेही एका घरात एखादा कुत्रा असायचा पण तो पण दाराबाहेर. तो कुत्रा सुद्धा कधी घरात यायचा विचार करायचा नाही. बाकी गायी बैल,म्हशी वगैरे शेतकऱ्याकडे. हे सगळे पाळीव प्राणी काहीना काही कामासाठी पाळल्या जायची, कुत्रा घर ,शेत सांभाळायला, गाय,म्हैस दुधा साठी,बैल शेतात कामासाठी,ह्यांना जिव पण तेवढाच लावल्या जायचा,अगदी घरातल्या एखादा सदस्या प्रमाणे ते असत. हौस म्हणून असे नसायचे.
पण आजकाल पाळीव प्राणी ह्याची व्याख्या बदललेली दिसतीये. आजकाल प्राणी पाळणे हे " स्टेटस सिम्बॉल "  झालंय. लोक काय काय पाळतायेत,ऐकूनच अंगावर काटा येतो, म्हणजे आपल्याला शाळेत जे पाळीव आणि हिंस्त्र प्राणी शिकवले होते ते सगळे खोटे वाटावे इथपर्यंत सरमिसळ झालिये ह्या प्राण्यांची, किवा जातकुळी बदललिये.
एक सहज किस्सा आठवला ह्या विषयाबद्दल चा, इंग्लिश मिडीयम शाळेत पाळीव प्राण्यांचा एखादा दिवस ठेवला जातो,त्यांचेकडे पाळीव प्राणी म्हणत नाहीत बरका,हा एकदम गावंढळ शब्द मानला जातो तिथे, तिथे   " पेट एेनीमल " म्हणतात बरका आणि त्यांचा ते दिवसही साजरा करतात,तर ह्या दिवशी प्रत्येक मुलाने त्याचा " पेट एेनीमल " शाळेत आणायचा,त्याला काय शिकवले असेल ते तिथे दाखवायचे, किवा त्याला सजून धजून तिथे न्यायचे.तर विषय हा होता की हे पेट ऐनीमल काय असावेत, कोण कुत्रा आणतो,कोणी मांजर, कोणी पोपट,इथपर्यंत ठीक,आता इथून पुढची यादी बघा, पाल,सरडा, घोरपड, साप, पांढरा - काळा उंदीर अजुन काय काय, आता ह्या काय पाळायच्या गोष्टी आहेत का? एका मुलाची मम्मी तिथे शाळेत मुलाच्या टीचर ला सांगत होती "आमच्या बंटी ला त्याचा "फुस्स" ( हे त्या सापाचे नाव आहे,पेट ऐनिमल चे पेट नेम) रात्री जवळ असल्या शिवाय झोपच लागत नाही,नेहमी तो जवळ लागतो त्याला."आहे की नाही कमाल,इथे आमच्या लहानपणी आमची आजी आम्हाला लहानपणी संध्याकाळी सात नंतर "साप" हा शब्द सुद्धा उच्चारू द्यायची नाही,इथे तर हा बहाद्दर सापाशिवाय झोपत नाहीये,बोला आता. असो हा झाला गमतीचा भाग.
पण खरंच विचार करायला लावणारी गोष्ट आहे ही,का बरं आजकाल मुले काय किवा मोठी माणसे काय ह्या अश्या पेट एनिमल कडे जास्त ओढल्या जाता येत. का, काय करणे असतील ह्या मागे?
पाश्चात्य देशात तर ह्याची कमाल करतायेत लोक, पाळीव प्राण्यांना इस्टेट काय, घरं काय, काय काय ठेऊन जातात, हे असे ऐकले की खरंच खूप नवल वाटायचे अगोदर,पण आता तर हेच सगळे आपल्याकडे ही होऊ लागलेय,का होत असावे असे, माणसांची ,नात्यांची येवढी कमतरता भासावी,की हे पाळीव प्राणी माणसांची/ नात्यांची जागा घेऊ लागलीत? पण खरंच सांगा हे असे बरोबर आहे का, मी पाळीव प्राण्यांच्या विरोधात बोलतोय असे नाही, पण हे पाळीव प्राणी घरातील एक सदस्य ना होता घरातल्यांची जागा घेऊ लागलीत ह्याची भीती वाटते. (Substitute).
माणसांपेक्षा , नात्यापेक्षा हे पाळीव प्राणी वरचढ होऊ लागलीयेत ह्याची भीती वाटते. कोणाला वाटेल ह्यात येवढे  घाबरण्यासारखे ते काय आहे,ज्याची त्याची आवड. हो हे देखील मान्य, पण ह्याचे प्रमाण खूप वाढतेय,ही चिंतेची बाब नक्कीच नाही का?
असे काही आहे का की माणसांवरचा/ नात्यांवरचा विश्वास हळू हळू लोप पावतोय, पाळीव प्राणी पाळणे, हे माणसे/ नाती सांभालण्या पेक्षा सोपे झालेय?
मी कारणे शोधतोय, तुम्हाला काही सापडतायेत बघा,मिळालीच तर मला पण सांगा......
आशुतोष दंडगव्हाळ......

" तो फक्त हसत राहिला...आणि आतून तुटत गेला..."

दि.३०/०५/२०२६... आजकालच्या जगात माणसं खूप जोडली गेली आहेत… फोनमध्ये contacts वाढले, social media वर followers वाढले, गप्पा वाढल्या, status व...