Sunday, July 17, 2022

" सुरवंट"


दि.१७.०६.२०२२

फुलपाखरू !

छान किती दिसते ! फुलपाखरू

या वेलींवर ! फुलांबरोबर

गोड किती हसते ! फुलपाखरू

पंख चिमुकले ! निळेजांभळे

हलवूनी झुलते ! फुलपाखरू

डोळे बारीक ! करिती लुकलुक

गोल मणी जणु ते ! फुलपाखरू

मी धरू जाता ! येई न हाता

दूरच ते उडते ! फुलपाखरू

कवी- ग.हा. पाटील.

कवी ग.हा.पाटलांची ही कविता कोणा कोणाला आठवते...किती छान आणि अर्थपूर्ण कविता होती नाही का? अगदी समोर लक्ष लक्ष फुलपाखरं उडतायेत असे दृश्य डोळ्यासमोर उभे राहते,त्यांचे वेगवेगळे आकार,रंगसंगती,नक्षीकाम, भिरभिरत ह्या फुलावरून त्या फुलावर बागडतायेत कुठलेच आणि आजूबाजूचे काहीच भान न ठेवता.पण आपण फक्त त्या छान छान फुलपाखराला च बघतो, त्याचा जन्म कसा होतो ते आपण सोयीस्करपणे विसरून जातो,त्यात काही विशेष नाही म्हणा मानव स्वभावच तो, प्रसूतीच्या कळा कोण लक्षात ठेवतो म्हणा, हो की नाही..
सहज मनात आले तो सुरवंट काय विचार करत असेल स्वतःचे फुलपाखरा मध्ये रुपांतर होण्याबद्दल, खरंच त्याच्या मनात विचार येत असतील का, कि येवढ्या हाल अपेष्टा सहन करून अल्पष्या आयुष्यासाठी फुलपाखरू व्हावे का? की त्याच्या जीवनाची ती परिपूर्णता असेल,जी काहीही झाले तरी त्याला पार पाडावीच लागणार आहे,त्याच्या मनात असो वां नसो. असेही असू शकेल त्यालाही तेवढीच ओढ असेल, उत्सुकता असेल, हौस असेल, त्या फुलपाखरू बनल्या वर मिळणाऱ्या आयुष्याची.... माणसासारखे च....


माणूस नाही का लहान असतो तेव्हा, मोठे होण्या ची घाई असते. मोठे किती मजा करतात, लहान असताना केवढा त्रास,शाळेत जा,अभ्यास करा,परीक्षा द्या, वगैरे वगैरे, म्हणून मग त्यापेक्षा पटकन मोठे होऊन जाऊ असे वाटत असते, तसेच बहुतेक त्या सुरवंटाला वाटत असावे. आपण कसे प्लॅन्स बनवतो मोठे होऊन आपण हे करू ,ते करू, सगळ्यांना आनंद देऊ,सगळ्यांसाठी करू,त्यात स्वतः साठीचे पण प्लॅन्स असतातच की.. हो की नाही? असेच आणि किंबहुना हेच त्यालाही ( सुरवंटाला) वाटत असणार,तेही भविष्यातील रंगीबेरंगी स्वप्न उराशी बाळगून, त्या आनंदात स्वतःला त्या कोशात गुरफटून घेत असेल,एक सुंदर, मनमोहक फुलपाखरू बनायला,आपले आयुष्य पूर्णत्वाकडे न्यायला...


मग काही दिवसांनी फुलपाखरू बनल्यावर त्याचा आनंद कोण गगनात मावेनासा होतो,सगळे आकाश कवेत घ्याय साठी उंच भरारी घ्यायसाठी मन नुसते उचंबळून येते, काय करू आणि काय नाही असे होते, हे करू का ते करू,इथे जाऊ का तिथे जाऊ,हे बघू का ते बघू... नुसते नुसते भिरभिरत राहते,आनंदाला उधाण येते, आपल्या अंगावरच्या नक्षीकामाने आणि असंख्य रंगसंगती ने  समोरच्याला मंत्रमुग्ध करून सोडते, सगळ्यांना हवेहवसे होते, सगळ्यांनाच ते आपल्या जवळ असावे असे वाटते, फुलं त्याला आकर्षित करतात,ये माझ्याकडे ये,माझे मधू खूप गोड आहे,बघ ये माझेकडे,ते वेडे जातेपण, हो पण त्याला हे कळत नाही की त्यात फुलाचा स्वार्थच जास्त असतो,कारण ह्याच्या पायाला त्या फुलाचे परागकण लागून त्याची पुढे नवीन उत्पत्ती होणार असते,हे त्या फुलझाडाला पक्के ठाऊक असते,पण त्या वेड्या फुलपाखराला नसते,त्याला वाटते किती हे फूल छान आहे, आपल्याला गोड गोड मध खायला देतोय....आपलेही काहीसे असेच होते का हो........


फुलपाखरू एकदम खुश असते स्वतःच्या दिसण्याचा त्याला भयंकर अभिमान वाटतो,त्याच खुशीत तो पुढे त्याच्या आयुष्यात काय लिहिलंय त्याकडे बघतच नाही,बहुतेक त्याचे लक्षच जात नसावे... आणि मग एके दिवशी कोणाच्या आणि कुठल्या तरी जाळीत अडकून ते कोणाच्यातरी स्पेसिमन बुक मध्ये चिटकलेले असते,त्याच्या अंगावरची नक्षी,रंगसंगती हळूहळू त्या वहीच्या पानावर विखरून जाते....आणि.......


माणसाचे आयुष्य आणि त्या फुलपाखराचे आयुष्य सारखे वाटते का, मला तर खूप same to same वाटते......


हे चांगले का वाईट हा ज्याचा त्याचा प्रश्न,आणि ज्याचे त्याचे उत्तर.....


तुमचे प्रश्न आणि उत्तरे वाचायला नक्की आवडेल, सांगा तर मग.....


आशुतोष दंडगव्हाळ....


" तो फक्त हसत राहिला...आणि आतून तुटत गेला..."

दि.३०/०५/२०२६... आजकालच्या जगात माणसं खूप जोडली गेली आहेत… फोनमध्ये contacts वाढले, social media वर followers वाढले, गप्पा वाढल्या, status व...