Tuesday, September 1, 2020

" एकटेपण "

 


दि. ०१.०९.२०

" एकटेपण "....

काल रात्री बऱ्याच दिवसांनी एक मराठी चित्रपट पाहण्यात आला " लॉस्ट & फाऊंड" ( Lost & Found ). विषय छान होता, मांडणी छान होती,नक्की काय सांगायचे ते माहीत होते,हलका - फुलका होता, आजच्या एकूण परिस्थितीवर भाष्य करणारा होता.

कथा चार लोकांची होती, श्रीरंग काका, मानस, नैना आणि मारुती. चौघेही वेगवेगळ्या परिस्थितीमुळे ( आयुष्यात घडलेल्या घटनांमुळे) एकटे पडले होते, तर ही अशी एकटी पडलेली मंडळी एकत्र येऊन दुसऱ्यांचे एकटेपण घालवण्याचा प्रयत्न करतात आणि त्यातून स्वतःचे एकटेपण दूर करतात.अशी ही छोटीशीच कथा,पण विचार करायला भाग पाडणारी,अस्वस्थ करणारी आहे. खूप काही शिकवून जाणारी.

खरंच थोडेसे आजूबाजूला पाहिले तर आपल्यालाही असेच कितीतरी लोक दिसतील जे वरवर पाहता सुखी समाधानी दिसत असतील पण आतून खूप खूप एकटे असतील. आजकाल आपण फक्त समोरच्याचे भौतिक सुख सुविधांकडेच पहिल्यांदा बघतो, पण त्याचे मन जाणून घ्यायचा कधीच प्रयत्न करत नाही. आणि हे असे कदाचित आपल्या जवळच्या माणसांबद्दल पण होऊ शकत असेल, म्हणायला आपण म्हणू की त्यांना काय कमी करतो का, सगळे वेळच्या वेळी असते, पाहिजे ते पाहिजे तेव्हा पुरवतो, फिरायला चार चाकी आहे वगैरे वगैरे. पण कधी त्यांच्याजवळ बसून त्यांचेशी दोन सुखदुःखाच्या गोष्टी करतो का, त्यांना नक्की काय हवयं ते विचारतो का,तर ह्याचे उत्तर बहुतेक ठिकाणी नाही हेच येईल. मग कशावरून ती माणसं खरंच सुखी आहेत किवा एकटी नसतील असे म्हणू शकू आपण?

भौतिक सुखाच्या मागे लागून, आपण खरे सुख गमावत तर नाही आहोत ना, ज्या सुखाला अंत नाही अश्या सुखाला मिळवण्याच्या नादात एकटे तर पडत नाही आहोत ना आपण? सुखदुःखाच्या चार गोष्टी ज्याच्याजवळ बोलता येतील असे कोणी आपल्या आजूबाजूला आहेत की नाहीत ह्याकडे कधी लक्ष जाते का आपले? ते वेळीच द्यायला हवे नाहीतर नंतर खूप उशीर झालेला असेल.

तुम्हाला कोणी सांगितले की अशी चार नावे द्या ज्यांना तुम्ही तुमचे जवळचे म्हणू शकाल,ज्यांचेकडे तुम्ही मन मोकळे करू शकाल,तुम्ही कुठल्याही संकटात असाल तर ते कुठलाही विचार नाही करता तुमच्या मदतीला धाऊन येतील,अशी चार नावे द्यायचा प्रयत्न करा, जर ही अशी चार नावे जराही वेळ न घेता देऊ शकलात तर अजून तुमच्यावर एकटे पडायची वेळ आली नाहीये,हे समजावे आणि त्या चाराचे आठ नावे कशी होतील ह्याकडे लक्ष द्यावे. एकटेपण आपोआप दूर होईल.

खरेतर हा विषय असा आहे कि हजारो पाने लिहिली तरी संपणार नाही,पण येवढेच महत्वाचे की कुठे आणि किती वेळ द्यायचा ते कळायला हवे, माणसे जोडायला शिकायला हवे, जसे आपले सगळे ऐकायला कोणी हवे तसे समोरच्याला ही त्याचे ऐकण्यासाठी कोणी लागणार आहे हा विचार करायला हवा, समोरच्याचेही ऐकण्याची तयारी हवी. आपल्याला मन हलके करावेसे वाटते,तसे समोरच्या लाही वाटत असणारच ना..

मग, विचार कसला करताय, नावे शोधायला सुरुवात करा, ऐकायला सुरुवात करा...

आशुतोष दंडगव्हाळ.....


Wednesday, August 12, 2020

" देव की माणूस "

 दि.१२.०८.२०२०
" देव की माणूस "
विषयावरून लेखाची थोडी कल्पना आली असेल वाचकांना ही अपेक्षा.सध्याचा परिस्थितीवरून ( डॉक्टरांवरील हल्ले,पोलिसांवरील हल्ले ) हा लेख लिहायला विषय मिळाला.अगोदर ह्याच लोकांसाठी आपण थाळीनाद केला, बँड वाजवला,दिवे लावले, त्यांचे सत्कार केले अगदी देवत्व बहाल केले त्यांना, मग अचानक एकदम हल्ले, शिव्याशाप, डाकू - दरोडेखोर ठरऊन मोकळेही झालो आपण. दोन्ही ठिकाणी आपणच आहोत,समोरचाही तोच आहे. मग असे एकदम दोन टोकाच्या भूमिका का घेतो आपण नेहमीच? खरंच का समोरचा माणूस येवढ्या लवकर बदलत असेल का,की आपण त्याचा सत्कार केल्यानंतर लगेच तो आपल्याला लुटायला लागला,वाईट वागायला लागला? माझ्यामते आपण कुठेतरी चुकतोय किवा आपल्या विचारात,समजण्यात नक्कीच कुठेतरी गडबड होतीये, तुम्हाला वाटत नाहीये का असे? तुमच्या मनात हयाबद्दल वा ह्या परिस्थती बद्दल प्रश्न निर्माण होत नाहीयेत का?
मला ह्याचे जे कारण दिसतेय ते बघा तुम्हालाही पटतंय का ते. "आपण एखाद्याला लगेच देवत्व बहाल करतो,तो माणूस आहे हेच विसरून जातो". एकदा का त्याला देवत्व बहाल केले की त्याचेकडून अगदी देवाकडून जश्या अपेक्षा ठेवतो तश्या अपेक्षा त्या साध्या माणसाकडून ठेवायला सुरुवात करतो, वर त्याने चमत्कार ही करावेत ही पण कड असते, वेळोवेळी त्याने असे चमत्कार करून देवासारखे सगळे आपण जे मागू ते पुरऊन त्याला बहाल केले देवत्व त्याने सिद्ध करत राहावे ,आणि रहायलाच पाहिजे,आम्ही यासाठीच तर त्याला देवत्व बहाल केलंय,असे अजून मुठ आवळून सांगतो,आणि ह्या सगळ्यात त कुठे कमी पडला, किवा चुकला की लगेच त्याला तितक्याच तत्परतेने दानवही ठरऊन मोकळे होतो.
एखाद्या माणूस,माणसं सारखे ना वागता थोडे स्वतःतले देवपण जागे करून जरा कुठे देवासारखा वागला रे वागला की लगेच त्याला आपण " देव " करून मोकळे, का हा असा अट्टाहास आपला,त्याला भले तर तुम्ही " देवमाणूस " म्हणा, " देव" का करता त्याचा? तो तर तुम्हाला म्हणत नाही,मला देव म्हणा,माझी पूजा करा,मग आपलाच हा आततायी पणा होतोय असे वाटत नाही का? आपण एकदम दोन टोकाच्या भूमिका घेतो असे मला वाटते,मध्ये कुठे अजून एक पर्याय आहे हे आपण लक्षातच घेत नाही. एक तर लगेच देवत्व बहाल करायचे नाहीतर एकदम दानव ठरून टाकायचे,पण ज्याला आपण देव किवा दानव ठरवतोय तो अगोदर एक साधा तुमच्या आमच्या सारखा माणूस आहे हे आपण का विसरतो? त्यालाही त्याचा स्वार्थ आहे, गरजा आहेत,भावना आहेत,परिवार आहे,त्याचीही स्वतःची काही मते असतील,हे आपण विसरून का जातो, तेही अगदी सोयीस्कर रीत्या.
हे वर जे काही लिहिले ते अजून पटकन समजण्यासाठी काही उदाहरणं द्याविशी वाटतायत, सचिन तेंडुलकर,अमिताभ बच्चन,रजनीकांत ही काही नावे आणि अशी बरीच अजून घेता येतील वेगवेगळ्या क्षेत्रातली. अशी बरीच उदाहरणं देता येतील, पण आपण हा कधी विचार केलाय का की सगळ्यात आधी ही तुमच्या आमच्या सारखी माणसे आहेत. आपल्या अश्या देवत्व बहाल करण्याने ह्या लोकांना किती त्रास सहन करावा लागत असेल, ह्या देव पणाचे दडपण येत असेल, लोकांच्या अवास्तव अपेक्षा त्या पूर्ण न झाल्या नंतरच्या येणाऱ्या अपेक्षाभंगातून लोकांनी दिलेला त्रास सहन करावा लागत असेल ह्याचा कधी आपण विचार केलाय का? करतो का?
हेच सगळे आपल्यालाही  लागू होते, मग त्यातून कोणीच सुटू शकत नाही,उद्या तुमच्यावर पण अशी वेळ येऊ शकते,त्यावेळेस कळेल की असे मिळालेले देवपण किवा दानव निभावणे किती अवघड असते ते.तेव्हा समोरच्याला लगेच देवत्व बहाल करून 
त्यांचेकडून अवास्तव अपेक्षा ठेवणे बरोबर का चूक ते कळेल किवा त्याला दानव ठरऊन त्याच्यावर हल्ले करणे किवा त्याला अपेक्षा पुर्ण करता नाही आल्या म्हणून आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करणे किती बरोबर ते कळेल.
आपण जर नेहमी असेच दोन टोकांच्या भूमिकेत वागत राहिलो तर कोणी स्वतातल्या देव माणसाला जागे होऊ देणार नाही,माणुसकी उरणार नाही,कोणी तो दाखवायची हिम्मत पण करणार नाही. मग उगाच माणुसकी कमी झालीय/ उरली नाही जगात म्हणून कोणी गळे काढायची सोय उरणार नाही.
तेव्हा इथून पुढे पण करुया माणसाला देवत्व बहाल न करता त्यातल्या देव माणसाला वंदन करुया, त्याला देव न समजता देवमाणूस समजुया त्याला माणूस म्हणून स्वीकारू या.....
आशुतोष दंडगव्हाळ......

Sunday, June 21, 2020

" कमनशिबी "

" कमनशिबी - माझे नशिबच फुटके" .....
तुम्ही म्हणाल काय हे, काय झाले ह्याला,असे का बोलतोय हा, तर मित्रहो मी हा शब्द आजच्या माझ्या लेखाचा विषय आहे, त्यासाठी हे शिर्षक घेतलेय,कारण ह्याला पर्यायी शिर्षक देणे मला योग्य वाटले नाही, त्याला कारण आहे, हा शब्द किवा हे वाक्य. " माझे नशिबच फुटके, मी कपाळ करंटा, कमनशिबी आणि अजून काय काय. हे असे शब्द/ वाक्य, तुम्ही/ आम्ही रोज ऐकत असतो, कधी कधी म्हणतही असतो.
आपण किती सहजपणे,कधीही,कुठेही,जराही विचार न करता, मनाविरुद्ध थोडे काही झाले की म्हणून मोकळे होतो,माझे नशिबच फुटके,असे कसे देवानी माझे नशिब लिहिले,असे म्हणून कधी देवाच्या, कधी आई - बापाच्या,कधी ऑफिस च्या,कधी बॉस च्या,कधी अजून कुठल्या नावाने आपल्या नशिबाला कोसत असतो, आपण नुसते कारणेच शोधत असतो त्या नशिबाच्या नावाने बोटे मोडायला,हो की नाही करतो ना आपण असे?
पण कधी आपण हा विचार करतो का, खरच आपण हा शब्द वापरायला हवा का? खरंच का हा शब्द इतक्या सहजरीत्या वापरण्यासारखा आहे का? ह्या शब्दाला स्वतःचे असे वजन उरलेच नाही का आपल्या लेखी, की इतक्या सहजरित्या आपण तो कधीही,कुठेही काहीही मागचा पुढचा विचार न करता वापरायला लागलोय? 
मला ह्या प्रश्नाचे उत्तर विचाराल तर माझे उत्तर "हो" हे असेल.आपण ह्या शब्दाचे गांभीर्य,त्याचा खरा आशय,तो शब्द उच्चारणे किती वाईटपणाचे आहे हे सगळे विसरून गेलोय. आपल्या घरातील वयस्कर ( आजी - आजोबा) मंडळी हा शब्द वापरताना चारदा विचार करून वापरताना आपण पाहाल,पण मग आपणच हा शब्द इतक्या सहजरीत्या का वापरायला लागलोय,समोरच्याची सहानभूती मिळवायला हाच शब्द आता उरलाय का,साधे पणाने सांगितले तर समोरच्याला ते खरे वाटत नाहीये का? प्रत्येकवेळी आपल्या सांगण्याच्या गांभीर्या साठी जर हा शब्द वापरावा लागत असेल तर अश्या ठिकाणी आपण आपले म्हणणे,सांगणे मांडणे कितपत योग्य? त्याही पेक्षा महत्वा चा प्रश्नः हा आहे की आपण प्रत्येकवेळी नशिबालाच का दोष देत बसावे?
एखादी गोष्ट तुमच्या मनासारखी होत नसेल,तुम्हाला जे हवे ते मिळत नसेल, तर त्याला फक्त एकटे नशिबच दोषी कसे असू शकते, हा विचार कधी आपण करणार आहोत की नाही? 
समजा एखादी गोष्ट नाही मिळाली आपल्याला,नाही मनासारखे काही झाले त्यात, तर ती आपल्याला का मिळाली नसेल हा विचार अगोदर व्हायला हवा की नको, ती मिळवण्यात कुठे आपले प्रयत्न पुर्ण होते का,ते बरोबर होते का,ती गोष्ट खरंच आपल्यासाठी महत्त्व पुर्ण होती का? ह्या आणि अश्याच प्रश्नांची उत्तरे आपण शोधायचा प्रामाणिक प्रयत्न आपल्याकडून केला जातो का? आपण देवा वर श्रद्धा ठेवणारी माणसे,मग नेमके आपण हे असे काही मिळाले नाही, किवा मनासारखे काही झाले नाही की त्याच देवाला दोष का देतो ज्याचेवर आपली अपार श्रद्धा आहे? देव कोणाचे वाईट करत नाही,कोणाचे नशिब तो वाईट लिहीत नाही, त्याच्या प्रत्येक गोष्टीला, त्या गोष्टी च्या असण्याला कारणे असतात,हे तुम्ही मानता, हो की नाही? मग नेमके आपल्या मनासारखे काही न मिळाल्यावर आपण लगेच देवाला कोठडीत का उभे करतो? नशिबाला दोष का देतो? काही ती गोष्ट सौम्यपणे मान्य करतात की जाऊदे आपल्या नशिबात नव्हती ती गोष्ट,म्हणून सोडून देतात. तर काही जण आकांडतांडव करून नशिबाच्या नावाने बोटे मोडून,शिव्याशाप ( कमनशिबी,कपाळकरंटा) करून ,व्यसन करून आपले दुःख व्यक्त करतात.पण खूप थोडी लोक असतील जे नशिबाला दोष न देता त्यामागची कारणे शोधण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत असतील,आणि मला वाटते हीच ती थोडी लोक आयुष्यात सुखी आणि यशस्वी झालेली आपण पाहात असू, आणि हेच सत्य आहे असे मला मनापासून वाटते.
आता कधी असेही होते की आपण खूप प्रामाणिक प्रयत्न करूनही काही कारणांनी मनासारखी गोष्ट आपल्याला मिळत नाही, आणि तीच गोष्ट दुसऱ्याला काहीही ना करता सहजरीत्या मिळून जाते. मान्य आहे अश्या वेळी मनस्थिती खरंच खूप खराब असते,होते पण,काही ते सहन करू शकतात ,काही नाही.अश्या वेळेस सारासार विचार करायची क्षमता सुद्धा जाते,पण मग अश्याच स्थितीला सामोरे जाण्यासाठी आपल्या आजूबाजूला आपली माणसे,नातेवाईक,मित्र असायला हवीत,जी आपल्याला ह्या स्थिती तून बाहेर यायला मदत करतील,बरोबर की नाही? असे काहीच आपल्या आयुष्यात अतर्क्य घडत नाही ज्याला उपाय नसतील किवा आपण प्रामाणिक पणे प्रयत्न केल्यावर गोष्टी मनासारख्या होतील,मिळतील.( हे मी ९९% लोकांच्या बाबतीत बोलतोय, १% असे असतीलही की खरंच त्यांना कमनशिबी हा शब्द वापरावाच लागत असेल.). 
एखादी गोष्ट आपल्याला नाहीच मिळाली तर असे आपण का समजू नये की ह्यापेक्षा चांगली गोष्ट आपल्या नशिबात असू शकेल,मिळणार असेल,यादृष्टीने विचार करून तसे प्रयत्न करावे, प्रयत्नांची दिशा बदलून बघावी,मार्ग वेगळे निवडावेत, नुसते नशिबाला दोष देऊन शांत बसण्यात काय हाशिल?
ह्यापुढे स्वतःसाठी " कमनशिबी" हा शब्द वापरायच्या अगोदर श्रीकृष्णाला( आता तुम्ही म्हणाल ते देव होते,पण तरीही मी त्यांचे नाव घेऊन,का ते तुम्ही मला सांगा,नक्की सांगा.) महाभारतातील पितामह भिष्माना, कर्णाला नक्की आठवा,आणि मगच स्वतःसाठी कमनशिबी शब्द वापरणे खरंच गरजेचे आहे का ते ठरवा....
मी श्रीकृष्ण,पितामह भीष्म,आणि कर्णाचे उदाहरण का घेतले असेल? तुमच्या उत्तराची आतुरतेने वाट बघतोय....
आशुतोष दंडगव्हाळ.....

Tuesday, April 7, 2020

" पाळीव प्राणी "

दि.२९.०८.२०१९
"पाळीव प्राणी"
अगदी बालवाडी पासून आपण शिकत आलोय पाळीव प्राणी - हिंस्त्र प्राणी. सहसा पाळीव म्हटले की आपल्या समोर, गाय,बैल,मांजर,कुत्रा ह्यापेक्षा जास्त काही आपल्या डोळ्यासमोर येत नाही, निदान माझ्या तरी. तेही एका घरात एखादा कुत्रा असायचा पण तो पण दाराबाहेर. तो कुत्रा सुद्धा कधी घरात यायचा विचार करायचा नाही. बाकी गायी बैल,म्हशी वगैरे शेतकऱ्याकडे. हे सगळे पाळीव प्राणी काहीना काही कामासाठी पाळल्या जायची, कुत्रा घर ,शेत सांभाळायला, गाय,म्हैस दुधा साठी,बैल शेतात कामासाठी,ह्यांना जिव पण तेवढाच लावल्या जायचा,अगदी घरातल्या एखादा सदस्या प्रमाणे ते असत. हौस म्हणून असे नसायचे.
पण आजकाल पाळीव प्राणी ह्याची व्याख्या बदललेली दिसतीये. आजकाल प्राणी पाळणे हे " स्टेटस सिम्बॉल "  झालंय. लोक काय काय पाळतायेत,ऐकूनच अंगावर काटा येतो, म्हणजे आपल्याला शाळेत जे पाळीव आणि हिंस्त्र प्राणी शिकवले होते ते सगळे खोटे वाटावे इथपर्यंत सरमिसळ झालिये ह्या प्राण्यांची, किवा जातकुळी बदललिये.
एक सहज किस्सा आठवला ह्या विषयाबद्दल चा, इंग्लिश मिडीयम शाळेत पाळीव प्राण्यांचा एखादा दिवस ठेवला जातो,त्यांचेकडे पाळीव प्राणी म्हणत नाहीत बरका,हा एकदम गावंढळ शब्द मानला जातो तिथे, तिथे   " पेट एेनीमल " म्हणतात बरका आणि त्यांचा ते दिवसही साजरा करतात,तर ह्या दिवशी प्रत्येक मुलाने त्याचा " पेट एेनीमल " शाळेत आणायचा,त्याला काय शिकवले असेल ते तिथे दाखवायचे, किवा त्याला सजून धजून तिथे न्यायचे.तर विषय हा होता की हे पेट ऐनीमल काय असावेत, कोण कुत्रा आणतो,कोणी मांजर, कोणी पोपट,इथपर्यंत ठीक,आता इथून पुढची यादी बघा, पाल,सरडा, घोरपड, साप, पांढरा - काळा उंदीर अजुन काय काय, आता ह्या काय पाळायच्या गोष्टी आहेत का? एका मुलाची मम्मी तिथे शाळेत मुलाच्या टीचर ला सांगत होती "आमच्या बंटी ला त्याचा "फुस्स" ( हे त्या सापाचे नाव आहे,पेट ऐनिमल चे पेट नेम) रात्री जवळ असल्या शिवाय झोपच लागत नाही,नेहमी तो जवळ लागतो त्याला."आहे की नाही कमाल,इथे आमच्या लहानपणी आमची आजी आम्हाला लहानपणी संध्याकाळी सात नंतर "साप" हा शब्द सुद्धा उच्चारू द्यायची नाही,इथे तर हा बहाद्दर सापाशिवाय झोपत नाहीये,बोला आता. असो हा झाला गमतीचा भाग.
पण खरंच विचार करायला लावणारी गोष्ट आहे ही,का बरं आजकाल मुले काय किवा मोठी माणसे काय ह्या अश्या पेट एनिमल कडे जास्त ओढल्या जाता येत. का, काय करणे असतील ह्या मागे?
पाश्चात्य देशात तर ह्याची कमाल करतायेत लोक, पाळीव प्राण्यांना इस्टेट काय, घरं काय, काय काय ठेऊन जातात, हे असे ऐकले की खरंच खूप नवल वाटायचे अगोदर,पण आता तर हेच सगळे आपल्याकडे ही होऊ लागलेय,का होत असावे असे, माणसांची ,नात्यांची येवढी कमतरता भासावी,की हे पाळीव प्राणी माणसांची/ नात्यांची जागा घेऊ लागलीत? पण खरंच सांगा हे असे बरोबर आहे का, मी पाळीव प्राण्यांच्या विरोधात बोलतोय असे नाही, पण हे पाळीव प्राणी घरातील एक सदस्य ना होता घरातल्यांची जागा घेऊ लागलीत ह्याची भीती वाटते. (Substitute).
माणसांपेक्षा , नात्यापेक्षा हे पाळीव प्राणी वरचढ होऊ लागलीयेत ह्याची भीती वाटते. कोणाला वाटेल ह्यात येवढे  घाबरण्यासारखे ते काय आहे,ज्याची त्याची आवड. हो हे देखील मान्य, पण ह्याचे प्रमाण खूप वाढतेय,ही चिंतेची बाब नक्कीच नाही का?
असे काही आहे का की माणसांवरचा/ नात्यांवरचा विश्वास हळू हळू लोप पावतोय, पाळीव प्राणी पाळणे, हे माणसे/ नाती सांभालण्या पेक्षा सोपे झालेय?
मी कारणे शोधतोय, तुम्हाला काही सापडतायेत बघा,मिळालीच तर मला पण सांगा......
आशुतोष दंडगव्हाळ......

" तो फक्त हसत राहिला...आणि आतून तुटत गेला..."

दि.३०/०५/२०२६... आजकालच्या जगात माणसं खूप जोडली गेली आहेत… फोनमध्ये contacts वाढले, social media वर followers वाढले, गप्पा वाढल्या, status व...