दि. ०१.०९.२०
" एकटेपण "....
काल रात्री बऱ्याच दिवसांनी एक मराठी चित्रपट पाहण्यात आला " लॉस्ट & फाऊंड" ( Lost & Found ). विषय छान होता, मांडणी छान होती,नक्की काय सांगायचे ते माहीत होते,हलका - फुलका होता, आजच्या एकूण परिस्थितीवर भाष्य करणारा होता.
कथा चार लोकांची होती, श्रीरंग काका, मानस, नैना आणि मारुती. चौघेही वेगवेगळ्या परिस्थितीमुळे ( आयुष्यात घडलेल्या घटनांमुळे) एकटे पडले होते, तर ही अशी एकटी पडलेली मंडळी एकत्र येऊन दुसऱ्यांचे एकटेपण घालवण्याचा प्रयत्न करतात आणि त्यातून स्वतःचे एकटेपण दूर करतात.अशी ही छोटीशीच कथा,पण विचार करायला भाग पाडणारी,अस्वस्थ करणारी आहे. खूप काही शिकवून जाणारी.
खरंच थोडेसे आजूबाजूला पाहिले तर आपल्यालाही असेच कितीतरी लोक दिसतील जे वरवर पाहता सुखी समाधानी दिसत असतील पण आतून खूप खूप एकटे असतील. आजकाल आपण फक्त समोरच्याचे भौतिक सुख सुविधांकडेच पहिल्यांदा बघतो, पण त्याचे मन जाणून घ्यायचा कधीच प्रयत्न करत नाही. आणि हे असे कदाचित आपल्या जवळच्या माणसांबद्दल पण होऊ शकत असेल, म्हणायला आपण म्हणू की त्यांना काय कमी करतो का, सगळे वेळच्या वेळी असते, पाहिजे ते पाहिजे तेव्हा पुरवतो, फिरायला चार चाकी आहे वगैरे वगैरे. पण कधी त्यांच्याजवळ बसून त्यांचेशी दोन सुखदुःखाच्या गोष्टी करतो का, त्यांना नक्की काय हवयं ते विचारतो का,तर ह्याचे उत्तर बहुतेक ठिकाणी नाही हेच येईल. मग कशावरून ती माणसं खरंच सुखी आहेत किवा एकटी नसतील असे म्हणू शकू आपण?
भौतिक सुखाच्या मागे लागून, आपण खरे सुख गमावत तर नाही आहोत ना, ज्या सुखाला अंत नाही अश्या सुखाला मिळवण्याच्या नादात एकटे तर पडत नाही आहोत ना आपण? सुखदुःखाच्या चार गोष्टी ज्याच्याजवळ बोलता येतील असे कोणी आपल्या आजूबाजूला आहेत की नाहीत ह्याकडे कधी लक्ष जाते का आपले? ते वेळीच द्यायला हवे नाहीतर नंतर खूप उशीर झालेला असेल.
तुम्हाला कोणी सांगितले की अशी चार नावे द्या ज्यांना तुम्ही तुमचे जवळचे म्हणू शकाल,ज्यांचेकडे तुम्ही मन मोकळे करू शकाल,तुम्ही कुठल्याही संकटात असाल तर ते कुठलाही विचार नाही करता तुमच्या मदतीला धाऊन येतील,अशी चार नावे द्यायचा प्रयत्न करा, जर ही अशी चार नावे जराही वेळ न घेता देऊ शकलात तर अजून तुमच्यावर एकटे पडायची वेळ आली नाहीये,हे समजावे आणि त्या चाराचे आठ नावे कशी होतील ह्याकडे लक्ष द्यावे. एकटेपण आपोआप दूर होईल.
खरेतर हा विषय असा आहे कि हजारो पाने लिहिली तरी संपणार नाही,पण येवढेच महत्वाचे की कुठे आणि किती वेळ द्यायचा ते कळायला हवे, माणसे जोडायला शिकायला हवे, जसे आपले सगळे ऐकायला कोणी हवे तसे समोरच्याला ही त्याचे ऐकण्यासाठी कोणी लागणार आहे हा विचार करायला हवा, समोरच्याचेही ऐकण्याची तयारी हवी. आपल्याला मन हलके करावेसे वाटते,तसे समोरच्या लाही वाटत असणारच ना..
मग, विचार कसला करताय, नावे शोधायला सुरुवात करा, ऐकायला सुरुवात करा...
आशुतोष दंडगव्हाळ.....



