दि.१८/०९/२०२२..
भाषणे म्हटलं की लगेच शाळा आठवते, कारण बहुसंख्य जणांनी भाषणं ही शाळेतच केलेली असतात, मोठे झाल्यावर तोंड उघडायची संधी तशी खूपच कमी वेळेस मिळते.( मी माणसांची गोष्ट करतोय🤪 ). असो मजेचा भाग सोडा, मुद्दा हा की भाषण स्पर्धा म्हटले की सगळ्यांना शाळा आठवलीच पाहिजे, आणि शाळेतले आपले पाहिले भाषण, झालेली फजिती किंवा मिळालेली शाबासकी. पण ही शाबासकी फारच थोड्यांच्या नशिबात असायची, त्या नशीबवान लोकांमध्ये माझे नाव कधीच आले नाही ह्यासाठी हा लेखन प्रपंच.
तर हे आठवायचे कारण असे, माझेकडे लहान भावाची मुलगी (सद्ध्या ती तिसरीत शिकते)आलेली,माझी पुतणी, आल्या आल्या आशुकाका - आशु काका म्हणून मागे लागली,म्हटले काय, तर सांगायला लागली,"आमच्या शाळेत भाषण स्पर्धा आहे त्यात मी भाग घेतलाय, तुला म्हणून दाखऊ का माझे भाषण?" मी म्हटले हो दाखव की मज्जा एकदम. तिने पुढचे २-३ मिनिट इंग्रजीत भाषण म्हणून दाखवले, थोडे अडखळत, तिच्या मम्मीला विचारात काय ग मम्मी पुढे,असे करत ते भाषण संपवले. टिळकांवरचे ते भाषण होते पण इंग्रजीत असल्याने त्यात काही म्हणावा तेवढा जोश नव्हता, ह्यात त्या पोरीची चूक नाहीच ती इंग्रजी भाषाच अशी, त्याला ती बिचारी काय करणार, आणि दुसरे म्हणजे टिळकांवर च्या भाषणात " मी शेंगा खाल्ल्या नाही,मी टरफले उचलणार नाही...",हे वाक्य च गायब, दुसरे ते "स्वराज्य माझा जन्मसिद्ध अधिकार आहे,आणि तो मी मिळवणारच", हे ही नव्हते. कमाल आहे, ह्या दोन वाक्क्यां शिवाय टिळकां वरील भाषण पूर्णच होऊ शकणार नाही. घशाच्या नसा ताणून, आवाजात जोश आणून करायचे असे ते भाषण. असो पण त्या चिमुरडी ने, फर्ड्या इंग्लिश मध्ये भाषण केले. थोडे अडखळत, काही विसरलेले शब्दं अम्म अम्म करत, मग आईकडे मदतीच्या आशेने बघत,आईने पण लगेच prompting करत,एकदाचे ते भाषण संपले. पण छान जमलेले.
ह्या भाषण विसरण्याचा वा भाषणातील एखादे वाक्य किवा शब्दं म्हणा ऐनवेळी बेटा आठवतच नाही, आणि मग जी काही परिस्थिती होते ती खूपच विचित्र असते अहो. सगळे डोळे आपल्यावर असतात, किती वेगवेगळ्या प्रकारे ते डोळे पाहतात आपल्याकडे,ते आता लिहितानाही मला त्रास होतोय,जाऊदे नकोच त्याबद्दल लिहायला.तुम्ही पण ह्या परिस्थितीत तून नक्कीच गेला असाल, तेव्हा तुम्हाला कळलेच असेल,मला काय म्हणायचय ते, अगदी सगळे चित्र डोळ्यासमोर उभे राहिले असेल,हो की नाही😅😅....
मी मात्र ही परिस्थिती माझ्या प्रत्येक भाषणाच्या वेळी अनुभवली आहे, माझ्या आईला भाषणे लिहायला जाम आवडायचे,ती लिहायची पण खूप छान, पण तती भाषणे खूप मोठ - मोठी असायची,अगदी ५-६ पानांची, मग माझी वेळ यायची ती तेवढी पाने पाठ करायची आणि ऐनवेळी ती महत प्रयासाने आठवायची, आणि तुम्हाला सांगतो इथेच माशी शिंकायची. आई ८-१० वेळेस माझे कडून अगदी घोकून घ्यायची, अगदी जय्यत तयारी करून घ्यायची, मीपण भाषणाच्या दिवशी माझे नाव पुकारले की जोशात स्टेज वर जाऊन भाषण चालू करायचो, आणि मग थोडे भाषण झाले की तो जोश कुठल्या कुठे पळून जायचा आणि मग आमचा अम्म अम्म सुरू व्हायचे, मग सर म्हणायचे, बास दंडगव्हाळ आता,छान छान एकदम,पुढल्या वेळी नीट पाठ कर हो, बस खाली. मग भेदरलेल्या सश्या सारखे खाली मान घालून चुपचाप जागेवर येऊन घाम पुसत बसायचे. अगदी मेल्याहून मेल्यासारखे व्हायचे😏😥😥😥.
मग अजून काही मुलांची भाषणे व्हायची टाळ्या वाजवत ते सगळे ऐकून घ्यायचे, मग भाषणाला उभे रहात ते प्रमुख पाहुणे, त्यांच्या हातात भाषणाचा भला मोठा कागद असायचा तो ते त्या podium वर व्यवस्थित लाऊन,चष्मा wagare साफसूफ करून भाषणाला सुरुवात करायचे.मुलांना मंचावर चांगले बोलता यायला हवे,त्यांनी ह्यासाठी मेहनत घ्यायला हवी, आणि अजून बरेच काही,आणि गंमत म्हणजे हे सगळे ते त्या कागदात पाहून सांगत. तिथेच माझे टाळके खराब होई. चौथी - पाच वितल्या मुलांना भाषणे पाठ करून म्हणून दाखवायची अट,त्यात कुठलीच सुट म्हणून नाही,आणि हे स्वतः येवढे मोठे असून ह्यांना भाषणाचा कागद समोर ठेवायची,त्यात पाहून भाषणाची मुभा,निव्वळ चालूपणा आहे हा...असे विचार त्यांचे भाषण संपे पर्यंत यायचे..
मला सांगा हे असे चुकीचे आहे की नाही? ठीक आहे लहान मुलांकडून तुम्ही पाठांतर करून घ्या,पण असा दुष्टपणा नका ना करू, सगळ्या मुलांसमोर किती मेल्याहून मेल्यासारखे होते, आणि मुलं मग वर्षभर त्यावरून चीडवायचे, तो त्रास वेगळा सहन करावा लागायचा.😏
तर असा हा भाषणाचा किस्सा, कोणा कोणाला त्यांचे शाळेतले पाहिले भाषण आणि त्यावेळचा अनुभव आठवला,नक्की सांगा....😊
आशुतोष दंडगव्हाळ....
.jpeg)