Wednesday, August 12, 2020

" देव की माणूस "

 दि.१२.०८.२०२०
" देव की माणूस "
विषयावरून लेखाची थोडी कल्पना आली असेल वाचकांना ही अपेक्षा.सध्याचा परिस्थितीवरून ( डॉक्टरांवरील हल्ले,पोलिसांवरील हल्ले ) हा लेख लिहायला विषय मिळाला.अगोदर ह्याच लोकांसाठी आपण थाळीनाद केला, बँड वाजवला,दिवे लावले, त्यांचे सत्कार केले अगदी देवत्व बहाल केले त्यांना, मग अचानक एकदम हल्ले, शिव्याशाप, डाकू - दरोडेखोर ठरऊन मोकळेही झालो आपण. दोन्ही ठिकाणी आपणच आहोत,समोरचाही तोच आहे. मग असे एकदम दोन टोकाच्या भूमिका का घेतो आपण नेहमीच? खरंच का समोरचा माणूस येवढ्या लवकर बदलत असेल का,की आपण त्याचा सत्कार केल्यानंतर लगेच तो आपल्याला लुटायला लागला,वाईट वागायला लागला? माझ्यामते आपण कुठेतरी चुकतोय किवा आपल्या विचारात,समजण्यात नक्कीच कुठेतरी गडबड होतीये, तुम्हाला वाटत नाहीये का असे? तुमच्या मनात हयाबद्दल वा ह्या परिस्थती बद्दल प्रश्न निर्माण होत नाहीयेत का?
मला ह्याचे जे कारण दिसतेय ते बघा तुम्हालाही पटतंय का ते. "आपण एखाद्याला लगेच देवत्व बहाल करतो,तो माणूस आहे हेच विसरून जातो". एकदा का त्याला देवत्व बहाल केले की त्याचेकडून अगदी देवाकडून जश्या अपेक्षा ठेवतो तश्या अपेक्षा त्या साध्या माणसाकडून ठेवायला सुरुवात करतो, वर त्याने चमत्कार ही करावेत ही पण कड असते, वेळोवेळी त्याने असे चमत्कार करून देवासारखे सगळे आपण जे मागू ते पुरऊन त्याला बहाल केले देवत्व त्याने सिद्ध करत राहावे ,आणि रहायलाच पाहिजे,आम्ही यासाठीच तर त्याला देवत्व बहाल केलंय,असे अजून मुठ आवळून सांगतो,आणि ह्या सगळ्यात त कुठे कमी पडला, किवा चुकला की लगेच त्याला तितक्याच तत्परतेने दानवही ठरऊन मोकळे होतो.
एखाद्या माणूस,माणसं सारखे ना वागता थोडे स्वतःतले देवपण जागे करून जरा कुठे देवासारखा वागला रे वागला की लगेच त्याला आपण " देव " करून मोकळे, का हा असा अट्टाहास आपला,त्याला भले तर तुम्ही " देवमाणूस " म्हणा, " देव" का करता त्याचा? तो तर तुम्हाला म्हणत नाही,मला देव म्हणा,माझी पूजा करा,मग आपलाच हा आततायी पणा होतोय असे वाटत नाही का? आपण एकदम दोन टोकाच्या भूमिका घेतो असे मला वाटते,मध्ये कुठे अजून एक पर्याय आहे हे आपण लक्षातच घेत नाही. एक तर लगेच देवत्व बहाल करायचे नाहीतर एकदम दानव ठरून टाकायचे,पण ज्याला आपण देव किवा दानव ठरवतोय तो अगोदर एक साधा तुमच्या आमच्या सारखा माणूस आहे हे आपण का विसरतो? त्यालाही त्याचा स्वार्थ आहे, गरजा आहेत,भावना आहेत,परिवार आहे,त्याचीही स्वतःची काही मते असतील,हे आपण विसरून का जातो, तेही अगदी सोयीस्कर रीत्या.
हे वर जे काही लिहिले ते अजून पटकन समजण्यासाठी काही उदाहरणं द्याविशी वाटतायत, सचिन तेंडुलकर,अमिताभ बच्चन,रजनीकांत ही काही नावे आणि अशी बरीच अजून घेता येतील वेगवेगळ्या क्षेत्रातली. अशी बरीच उदाहरणं देता येतील, पण आपण हा कधी विचार केलाय का की सगळ्यात आधी ही तुमच्या आमच्या सारखी माणसे आहेत. आपल्या अश्या देवत्व बहाल करण्याने ह्या लोकांना किती त्रास सहन करावा लागत असेल, ह्या देव पणाचे दडपण येत असेल, लोकांच्या अवास्तव अपेक्षा त्या पूर्ण न झाल्या नंतरच्या येणाऱ्या अपेक्षाभंगातून लोकांनी दिलेला त्रास सहन करावा लागत असेल ह्याचा कधी आपण विचार केलाय का? करतो का?
हेच सगळे आपल्यालाही  लागू होते, मग त्यातून कोणीच सुटू शकत नाही,उद्या तुमच्यावर पण अशी वेळ येऊ शकते,त्यावेळेस कळेल की असे मिळालेले देवपण किवा दानव निभावणे किती अवघड असते ते.तेव्हा समोरच्याला लगेच देवत्व बहाल करून 
त्यांचेकडून अवास्तव अपेक्षा ठेवणे बरोबर का चूक ते कळेल किवा त्याला दानव ठरऊन त्याच्यावर हल्ले करणे किवा त्याला अपेक्षा पुर्ण करता नाही आल्या म्हणून आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करणे किती बरोबर ते कळेल.
आपण जर नेहमी असेच दोन टोकांच्या भूमिकेत वागत राहिलो तर कोणी स्वतातल्या देव माणसाला जागे होऊ देणार नाही,माणुसकी उरणार नाही,कोणी तो दाखवायची हिम्मत पण करणार नाही. मग उगाच माणुसकी कमी झालीय/ उरली नाही जगात म्हणून कोणी गळे काढायची सोय उरणार नाही.
तेव्हा इथून पुढे पण करुया माणसाला देवत्व बहाल न करता त्यातल्या देव माणसाला वंदन करुया, त्याला देव न समजता देवमाणूस समजुया त्याला माणूस म्हणून स्वीकारू या.....
आशुतोष दंडगव्हाळ......

" तो फक्त हसत राहिला...आणि आतून तुटत गेला..."

दि.३०/०५/२०२६... आजकालच्या जगात माणसं खूप जोडली गेली आहेत… फोनमध्ये contacts वाढले, social media वर followers वाढले, गप्पा वाढल्या, status व...