Sunday, March 19, 2023

सहज आपले एक मनात आलेले विचार ....

 


कामानिमित्त नेहमीच प्रवास होत असतो, प्रवासात अनेक प्रसंग येतात, खूप काही बघितल्या जाते, ऐकू येते. असेच कामानिमित्त प्रवासात असताना बघितलेला एक प्रसंग तुमच्यासोबत शेअर करावा वाटला,म्हणून हे लिखाण....

लातूरला सकाळी कारने निघालो, सलग दीड-एकशे किलोमिटर ड्रायव्हिंग झाले म्हणून म्हटले थोडे थांबावे, म्हणून थांबलो होतो, चहा पिताना सहज आपले इकडे तिकडे पाहत होतो, रस्त्याच्या पलीकडे एक भटके कुत्रे एका कपड्याच्या तुकड्या बरोबर खेळताना पाहिले, तो एकट्याच त्या कपड्याच्या तुकड्याशी खेळत होता,अगदी मस्त मजेत,आनंदात एकटेच खेळत होता,मध्येच आजूबाजूला कोणी येतंय का बघून परत त्या तुकड्याला तोंडात धरून पळापळी करत होते, हवेने तो तुकडा हलायचा,त्याला वाटायचे तोही त्याचेशी खेळतोय, तो अजून त्याला जोरात धरून इकडे तिकडे पळा पळी करून, लोळालोली करून अगदी तल्लीन होऊन खेळत होता,स्वतःच्याच विश्वात रममाण होता, मजा येत होती, त्याचे ते तसे खेळणे बघून. त्याचे आजूबाजूला अजिबात लक्षात नव्हते, कोण बघतय किवा काय, काही नाही, त्याचे त्याचे खेळणे चालूच. इतक्यात तिथे इकडून तिकडून अजून एक २-३ कुत्री आली, तीही अशीच रस्त्यावरची. तीही त्याचे बरोबर त्याच्या खेळात सामिल झाली, थोड्यावेळ खेळले सगळे मिळून, आणि मग परत जिकडे तिकडे निघून गेली. हा आपला hero मात्र काही तिथून हलला नाही, एका कुत्र्या मागे थोडा गेला खरा, पण लगेच कपड्याची आठवण येऊन परत त्याच्या त्या कपड्याच्या तुकड्याकडे येऊन परत खेळणे सुरू.

आपला hero आणि बाकीची सगळी कुत्री भटकी, ना त्यांना घर ना मालक. मिळेल ते खायचे, नाही मिळाले तर उपाशी, जागा मिळेल तिथे झोपायचे, अशी ही सगळी, बेवारस रस्त्यावरची कुत्री.

माझ्या मनात मात्र त्या कुत्र्याला पाहून उगाच एक विचार आला, खरेच आपण पण ह्या कुत्र्यासारखे बेवारस होत चाललो आहोत का,कोणाकडून अपेक्षा ठेवायच्या नाही, कोणी आले तर बोलायचे,खेळायचे,नाहीतर परत आपले आपले स्वतःशीच ,स्वतःतच राहायचे. एकटेच होत चाललोय का,आपल्यालाही असेच एकटेच ,स्वतःच स्वतःशी खेळावे लागेल का? कोणी आले बरोबर तर तेवढ्यापुरते सोबत,येण्याऱ्याची इच्छा संपली किवा त्याचे मन भरले की तो निघून जाणार, मग परत आपण एकटे.. कोणी सोबत राहिल वा असेल का...किती विचित्र परिस्थिती माणसाच्या आयुष्यात येऊन ठेपलिये....

छोटेखानी घराच्या,कुटुंबाच्या नादात म्हणा, अपेक्षा नको कोणाकडून च्या विचित्र कल्पनेत म्हणा, आपल्याला काय करायचे, आपला काय संबंध, उगाच ब्याद नको, अश्या आणि बरेचश्या गोष्टींमुळे आपण एकमेकांना पासून दूर होत चाललो आहोत काय?आपण बेवारस होत चाललोय की काय..... 

एक वेळ अशी ह्या कुत्र्यासारखे एकटे च खेळायची व राहायची वेळ आपल्यावर तर येणार नाही ना... विचार करण्यासारखा प्रश्न आहे खरा,हो की नाही... काय वाटते तुम्हाला....?

आशुतोष दंडगव्हाळ...


" तो फक्त हसत राहिला...आणि आतून तुटत गेला..."

दि.३०/०५/२०२६... आजकालच्या जगात माणसं खूप जोडली गेली आहेत… फोनमध्ये contacts वाढले, social media वर followers वाढले, गप्पा वाढल्या, status व...